शरद पवारांच पत्र मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शनक ठरत असतं देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला रोहित पवाराचं प्रतिउत्तर !
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
शरद पवारांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं, त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, “फडणवीसांनी राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधावा”, असा टोलाही रोहित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने काल (दि. १९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकरी आणि बाराबलुतेदारांच्या प्रश्नांबाबतचं निवेदन सादर केलं. तसेच केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकाने देखील आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केली. यावेळी बोलताना फडणवीसांनी, “शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विविध मागणी करत आहे. त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहून शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी करावी”, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला होता.फडणवीसांच्या या टीकेला रोहित पवारांनी ट्विटरद्वारे उत्तर दिलं आहे. “फडणवीसजी आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे असून त्यावर महाविकासआघाडी सरकार व मुख्यमंत्री साहेब काम करतच आहेत. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल. राहिला प्रश्न पवार साहेबांच्या पत्राचा. साहेबांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचं पत्र पंतप्रधान मोदीजींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं.त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल,असं मला वाटतं”, असे प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिले आहे.