आगामी लोकसभेसाठी ठाकरे-पवारांची रणनीती ; मातोश्रीवर बैठक, राष्ट्रवादी 10 ते 11 जागांसाठी आग्रही….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सध्या राज्यासह देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. सर्वच पक्षांनी आगामी लोकसभेसाठी कंबर कसली आहे.
अशातच महाविकास आघाडीतही (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन धुसफूस असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना (ठाकरे गट) (Thackeray Group), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अशातच याच पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि ठाकरे गटाची बैठक संपन्न झाली. ठाकरेंचं मुंबईतील (Mumbai) निवासस्थान मातोश्रीवर (Matoshree) बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत जागावाटपावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत मातोश्रीवर शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक पार पडली. संजय राऊत यांनी काँग्रेसला 23 जागांचं पत्र दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील आपल्या जागांबाबतची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. मातोश्रीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत दोन तास चर्चा पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 10 ते 11 जागा लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, अमरावती आणि भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा असल्याचीही माहिती आहे. अशातच महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर जानेवारीत काँग्रेससोबत
उद्धव ठाकरे, शरद पवार गटाच्या वरिष्ठांची बैठक दिल्लीत पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच अमरावती आणि भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा होणार आहेत.
राष्ट्रवादी ‘या’ जागा लढवणार?
शिरूर
सातारा
माढा
बारामती
जळगाव
रावेर
दिंडोरी
बीड
भिवंडी
अहमदनगर
अमरावती आणि भंडारा या जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू
काँग्रेसचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मविआतल्या जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. काल काँग्रेसची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीतील जागावाटपावर काँग्रेसचा फॉर्म्युला पत्रकारांच्या हाती लागला आहे. काँग्रेसच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस 22 जागांवर, शिवसेना 18 तर राष्ट्रवादी 6 जागांवर निवडणूक लढेल, तर वंचितलाही 2 जागा दिल्या जातील. काँग्रेस या फॉर्म्युल्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीशी चर्चा करणार आहे. शिवाय मुंबईतल्या तीन जागांवर काँग्रेस आग्रही असल्याचीही माहिती मिळत आहे. काँग्रेस आपल्या फॉर्म्युल्यावर शिवसेना राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी करणार असल्याचीही माहिती मिळत आहे.