परप्रांतीय मजुर निघून गेल्याने स्थानिकांना मिळेल संधी
मुख्यमंत्र्यांकडे संकेत स्थळ सुरु करण्याची शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांची मागणी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोना व्हायरस चा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने लॉकडाऊन मध्ये वाढ केली आहे. या दरम्यान मोठया प्रमाणात परप्रांतीय मजुर महाराष्ट्र सोडून आपल्या गावाकडे निघून गेले. सरकारने आता बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरु करण्यासाठी परवानगी दिली असल्याने स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील बेरोजगार तरुणांना तसेच उद्योजकांना माहिती होण्याकरीता संकेतस्थळ तसेच अॅप सुरु केल्यास फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे संपुर्ण माहिती असणारे संकेतस्थळ तसेच अॅप सुरु करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राव्दारे केली आहे.
गत दोन महिन्यापासून कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. ह्या प्रकोपामुळे संपूर्ण जग वेठीस धरले गेले. असे असले तरी आर्थिक चक्र फिरविण्यासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत प्रत्येक नागरीकाला पुढे जावे लागणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने सुध्दा उद्योग सुरू करण्याला परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात उद्योग धंद्यांमध्ये लाखो परप्रांतीय मजूर, कामगार वर्षानुवर्षे काम करीत आहे. लॉकडाऊन मुळे हे मजूर, कामगार आपल्या मूळ राज्यात परत गेले आहेत. यामुळे राज्यातील उद्योगांना आता मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासणार आहे. प्रत्येक उद्योगाला मनुष्यबळ शोधणे आणि बेरोजगार युवकांना नोकरी शोधणे शक्य होणार नाही. त्यामुळे उद्योगांकरिता मनुष्यबळ मिळवण्याच्या उद्देशाने उद्योग मंत्रालयातर्फे उद्योग धंद्यांमध्ये उपलब्ध नोकऱ्यांची माहिती देणारे संकेतस्थळ व त्याचबरोबर मोबाइल वर हाताळण्यासारखे अँप तयार करण्याची मागणी शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई, वनमंत्री ना. संजय राठोड, शिवसेनेचे विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर यांचेकडे केली आहे.
उपयोगाचे ठरेल अॅप
उद्योगधंद्याची तसेच त्यामध्ये आवश्यक असलेल्या रोजगाराची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याने हे अॅप तसेच संकेतस्थळ बेरोजगार तसेच उद्योजकांना फायद्याचे ठरणार आहे. ह्या अँप वर मनुष्यबळाची आवश्यकता असलेल्या उद्योगांना आपल्याला किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे ह्याची नोंदणी करता येईल. एवढेच नव्हे तर बेरोजगार युवकांना त्यांच्या स्किलनुसार नोकरीसाठी नोंदणी करता येईल. उद्योग धंद्यांना सुद्धा ह्या अँप वर नोंदणी केल्यावर आपल्या भागातील नोकरी साठी इच्छुक बेरोजगारांचा शोध घेता येईल व त्यांना ताबडतोब नोकरी साठी प्रस्ताव देता येईल.
स्थानिक बेरोजगारांना संधी
अशा पध्दतीचे अॅप तसेच संकेतस्थळ सुरु केल्यास वेळेची बचत होऊन महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय लवकर गती पकडेल. यामुळे स्थानिकांना प्राधान्य मिळून महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल. या उद्देशाने मी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पत्र देऊन अॅप तसेच संकेतस्थळ सुरु करण्याची विनंती केली आहे.
पराग पिंगळे
शिवसेना जिल्हाप्रमुख, यवतमाळ