भाजपनं छत्तीसगड, राजस्थान काँग्रेसकडून हिसकावलं, ‘मध्य प्रदेशात पुन्हा ‘कमळ’, तेलंगणात BRS बाहेर तर काँग्रेसची “एन्ट्री”

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- लोकसभेची सेमीफायनल असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा एकदा करिश्मा दिसून आला आहे. चार राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने बहुमताची आघाडी घेतली आहे.
तर तेलंगणात काँग्रेसने बाजी मारत भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) सत्तेतून बाहेर केले आहे. (Assembly Election Results 2023)
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, दुपारी १२.३० पर्यंत मध्य प्रदेशमध्ये भाजप १६० जागांवर आघाडीवर होते. तर काँग्रेस ६७ आणि बीएसपी २ जागांवर पुढे होते. राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव होताना दिसत असून येथे भाजपने १११ जागांची निर्णायक आघाडी घेतली आहे. तर येथे काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसडमध्ये सुरुवातीला काँग्रेस आघाडीवर आहे असे दिसत होते. पण दुपारनंतर चित्र बदलले आणि छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांपैकी भाजपने ५४ जागांवर मुसंडी मारली आहे. तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे.
तेलंगणात केसीआरला धक्का
तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना धक्का बसला आहे. येथील विधानसभेच्या ११९ जागांपैकी काँग्रेसने ६५ जागांची निर्णायक आघाडी घेतली आहे. तर बीआरएस ३९ जागांवर पुढे आहे. भाजप ९ आणि एमआयएम ४ जागांवर आघाडीवर आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) चे नेते के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी गजवेल आणि कामारेड्डी या दोन ठिकाणांवरुन निवडणूक लढवली आहे. केसीआर गजवेल मतदारसंघातून आघाडीवर आहेत. पण कामारेड्डीमध्ये ते पिछाडीवर आहेत.
मध्य प्रदेशात पुन्हा कमळ फुललं
मध्य प्रदेशमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यातील सरकारचे अभिनंदन केले आहे.
मध्य प्रदेशात भाजपला यश मिळाल्याने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी X वर पोस्ट करत ‘भारत माता की जय, जनता जनार्दन की जय’ असा नारा दिला आहे. ‘आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत आणि मला विश्वास आहे की जनतेच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करणार आहे. भाजपच्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन.’ असे शिवराज चौहान यांनी म्हटले आहे.
‘देश में एक ही गारंटी चलती है…मोदी की गारंटी
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने निर्णायक आघाडीच्या दिशेने वाटचाल केली आहे. यावर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत त्यांनी X वर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘देश में एक ही गारंटी चलती है…मोदी की गारंटी.’