पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघितलं अन् मुख्यमंत्रीपद ही गमावलं…! केसीआर यांची शोकांतिका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हैदराबाद :- तेलंगणा मध्ये एकीकडे राष्ट्रीय पटलावर आपलं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या के चंद्रशेखर राव यांना स्वतःचा तेलंगणाच्या बालेकिल्ला राखणे आता कठीण झाले आहे.
२०२३ च्या विधानसभा निवडणूकांचे आकडे समोर आले असून त्यात काँग्रेसने मोठी मुसंडी मारली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार सध्या काँग्रेस ६६ जागांवर आघाडीवर आहे. तर केसीआर यांच्या बीआरएस पक्षाला ४५ जागांवर पिछाडीवर आहे.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तेलंगणामध्ये पहिल्यांचाच सत्तापालट होण्याची शक्यता आहे. परंतु के.चंद्रशेखर राव हे एका बाजूला मोदींना पर्यायी चेहरा ठरतील का अशी चर्चा सुरु असताना त्यांचा स्वतःचाच बालेकिल्ला राखणे का शक्य होताना दिसत नाहीये?
भाजपाची ‘टीम बी असल्याचा आरोप भोवला?
तेलंगणातील जवळपास ७५ ते ८० टक्के समाज हा इतर मागास आणि मागास वर्गातील आहे. येथे सुरुवातीपासूनच भाजपच्या विचारसरणीला थारा मिळालेला नव्हता.
मात्र या निवडणुकांदरम्यान काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भारत राष्ट्र पक्ष हा कायमच भाजपाची बी टीम राहिला आहे असा मोठा प्रचार केला.
लोकसभा निवडणुकीत तेलंगणा भाजपाला मदत करते असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.
केसीआर यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसच्या रेवंथ रेड्डीचा चेहरा
काँग्रेसचे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अर्थातच काँग्रेसचा प्रभाव वाढविण्यासाठी कारणीभूत ठरली.
त्यातच काँग्रेसचे रेवंथ रेड्डी यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी देत काँग्रेसने केसीआर सरकारला मोठी टक्कर दिली. २०१४ मध्ये देखील रेवंत रेड्डी हे कोडंगल मधून आमदार झाले. यावेळीही त्यांनी गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला होता.
तब्बल १४ हजार ६१४ मतांनी रेवंत यांनी गुरुनाथ यांचा पराभव केला. यावेळी त्यांना तेलंगाणाच्या विधानसभेचा मुख्य नेता म्हणून घोषित केलं गेलं.
गेल्या काही वर्षात ते त्यांच्या भाषण कौशल्यामुळे काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर आले होते.
के.चंद्रशेखर राव यांचा ‘तेलगू देसम पक्ष’ ते ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ हा प्रवास कसा होता?
आंध्र प्रदेश येथे सध्या सत्ता पक्ष असणारा ‘तेलगू देसम पक्ष’ या पक्षाचा राजीनामा देत २००१ साली त्यांनी तेलंगणातील जनतेवर अन्याय होतोय असे सांगत स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.
त्याआधी साधारण चार दशके स्वतंत्र तेलंगणाची मागणी करण्यात येत होती. २००९ मध्ये केसीआर यांनी यासाठी केलेल्या आमरण उपोषणाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला होता.
त्यानंतर २०१४ साली स्वतंत्र तेलंगणाची स्थापना करण्यात आली. २०१४ पासून तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीची सत्ता आहे.
तेलंगणा राष्ट्र समिती ते भारत राष्ट्र समिती हा बदल कश्यासाठी?
तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांना दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्ष भाजप आणि काँग्रेस टक्कर देऊ शकली नव्हती. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत केसीआर यांच्या तेलगू राष्ट्र समिती यांना ११९ पैकी ६३ जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेस पक्षाला २१ जागा मिळाल्या होत्या.
तर २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत तेलगू राष्ट्र समितीला ८८ जागा आणि काँग्रेस पक्षाला १९ जागा मिळाल्या. तर भाजपाला ५ जागांच्या वर जात आले नव्हते.
खरे पाहता २०१४ साली संपूर्ण देशात भाजपचे वारे वाहत असताना देखील भाजपला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले होते.
त्यामुळे अर्थातच दोन्ही विधानसभा निवडणूकांमध्ये येथे केसीआर यांची निर्विवाद सत्ता होती. त्यामुळे पक्षाची पाळंमुळं अधिक घट्ट करण्याच्या हेतुने त्यांनी शेजारील राज्यांवर आपली छाप पडण्याचा प्रयत्न सुरु केला.
यामध्ये त्यांनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये तेलंगणा ही ओळख पुरेशी नाही म्हणून त्यांनी पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समिती या ऐवजी भारत राष्ट्र समिती असे केले.