‘आगामी काळात जनता मोठी की निवडून दिलेला नेता मोठा हे दाखवून देण्याची वेळ आलीये..’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- या परिस्थितीत शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारणेतून नवीन पिढी व क्रांती घडविण्याची वेळ आता आली आहे.
महाराष्ट्राच्या भूमीला संतांच्या विचारांचा वारसा आहे. जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण अशा विभूतींच्या विचारांचा वारसा आहे.
तोच वारसा पुढे घेऊन वाटचाल करणाऱ्या शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याच पाठीशी फलटण तालुक्यातील जनता व जिल्हा ठामपणे राहील, असा विश्वास ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी व्यक्त केला.
येथे राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष बांधणी, तालुका कार्यकारिणी व विविध समित्यांच्या निवडीसाठी तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन येथे करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणले, ”महाराष्ट्रात सध्या तोडफोड, फूट पाडा, जातीजातींमध्ये तेढ निर्माण करा, असे भयानक प्रकार सुरू आहेत; परंतु ही महाराष्ट्राची व जिल्ह्याची संस्कृती नाही. या परिस्थितीत शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारणेतून नवीन पिढी व क्रांती घडविण्याची वेळ आता आली आहे. विपरित राजकीय परिस्थितीतही वयाच्या ८२ व्या वर्षी तरुणाला लाजवेल, अशा पद्धतीने पवार यांचे काम सुरू आहे.
लोकप्रतिनिधी दुसरीकडे असले तरी सर्वसामान्य जनता मात्र शरद पवार यांच्या पाठीशी उभी असल्याचे चित्र सर्वत्र आहे. फलटण तालुकाही त्यास अपवाद नाही. तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले नीरा-देवघर, धोम-बलकवडी, रेल्वे व औद्योगिक प्रकल्प, कारखानदारीमध्ये पवार यांचे योगदान मोठे आहे. त्याची जाणीव सर्वसामान्य जनतेला आहे.” यावेळी रवींद्र बर्गे, प्रा. सुधीर इंगळे, माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड, तानाजी जगताप आदींसह शहर व तालुक्यातील विविध गावांमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
जनता की नेता मोठा दाखविण्याची वेळ
जनतेमुळे नेते निर्माण होतात. त्यामुळे आगामी काळात जनता मोठी की निवडून दिलेला नेता मोठा हे दाखवून देण्याची वेळ आली असून, तालुक्यातील जनता शरद पवार यांच्या पाठीशी उभी राहून ते निश्चितपणे दाखवून देईल, असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.