मराठी माणसाच्या महाराष्ट्रातील परिस्थितीला एकनाथ शिंदे जबाबदार ; संजय राऊतांनी थेट सुनावलं….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मराठी माणसाची महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे, याला एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.
निवडणुकीत भारत-पाकिस्तान नाही भारत खलिस्तान होणार असंही भाष्य त्यांनी केलं आहे. तसेच, राष्ट्रवादीचा फुटलेल्या गटातील काही लोकांना भाजपनं (BJP) काही काळासाठी निवडणूक आयोगात मेंबर केलंय, असं म्हणत संजय राऊतांनी थेट अजित पवार गटावरही निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या परिस्थितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे. त्यामुळेच शिवसेनेला कमकुवत करण्यात आलं. शिवसेना तोडण्याचं मुख्य कारण म्हणजे, मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज दाबला जाईल. मुंबईमधील मराठी माणसाचा आवाज, ताकद संपवण्यासाठीच भारतीय जनता पक्षानं शिवसेना तोडली आहे. तसेच, एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक बेईमान आहेत, हे सर्व जबाबदार आहेत. यातून आम्ही धडा घेतलाय, येत्या दिवसांत पाहाच काय होतंय.”
निवडणुकीत भारत-पाकिस्तान नाही भारत खलिस्तान होणार : संजय राऊत
आज कॅनडात सुरुवात केलीये, नंतर ब्रिटनमध्ये आले, आता हळूहळू दिल्लीत येतील, मग 2024 पर्यंत संपूर्ण वातावरण खराब केल्यानंतर आता देशाला कसा धोका आहे आणि एकच आपले नेता आहे, बाकी कोणीच नाही? असं सांगत भाजप प्रचार करेल, असं म्हणत संजय राऊतांनी थेट निशाणा साधला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी 10 वर्षांपूर्वी पाकिस्तानबाबत बोलायचे, त्यावेळी आम्हाला गर्व व्हायचा की, पंतप्रधानांची छाती 56 इंचाची आहे आणि पाकिस्तानला ते संपवूनच टाकणार, पण आता या निवडणुकीत भारत-पाकिस्तान नसेल, तर भारत-खलिस्तान असेल, याचीच तयारी सध्या देशात सुरू आहे, असं संजय राऊत म्हणाले.
फुटलेल्या राष्ट्रवादीच्या गटाला भाजपनं निवडणूक आयोगाचं मेंबर केलंय : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, “सुप्रीया सुळेंची भिती ही रास्त आहे. कारण खरंच इथे काहीही होऊ शकतं. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे काहीजण रोज नवनव्या तारखा द्यायचे. आता निर्णय आमच्याच बाजूनं लागणार, चिन्ह आम्हालाच मिळणार, अशी भाकितं करायचे. हे कोणत्या आधारावर सांगायचे? जणू यांना निवडणूक आयोगाचं मेंबर केलंय, असे ते तारखा सांगायचे. तसंच, आज बहुतेक फुटलेल्या राष्ट्रवादीच्या गटाला भाजपनं भारतीय निवडणूक आयोगाचं मेंबर करुन घेतलंय. पण लक्षात घ्या संविधान अजून जिवंत आहे.”