बाहेरच्या राज्यातील पक्ष शिवसेना भाजपची डोकेदुखी वाढवणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अब की बार किसान सरकारचा नारा देत भारत राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचा देशभर विस्तार करण्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यापूर्वीच केली आहे. राज्यातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून स्वतः राव त्यात लक्ष घालत आहेत.
ग्रामीण भागात पक्ष कार्यालये स्थापन करणे, इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात सामील करणे असा मोठा कार्यक्रम राव यांनी हाती घेतला आहे.
ग्रामीण भागानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात राव यांनी शिरकाव केला आहे. उल्हासनगर येथे भारत राष्ट्र समितीचे बॅनर लागल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेच्याा वर्धापन दिनानिमित्त शहरात बॅनरबाजी होत असतानाच हे बॅनर आता चर्चेचा विषय ठरत आहेत. (Latest Marathi News)
बीआरएसने आपल्या विस्ताराची सुरुवात नांदेड जिल्ह्यापासून केली असून मागील काही महिन्यांत नांदेड आणि लोहा येथे दोन जाहीर सभा घेतल्या आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर नांदेडमध्ये घेण्यात आले. नांदेड, सोलापूर, सांगली, संभाजीनगर नंतर नागपूर मध्ये पक्षवाढीवर भर देण्यात आला.(Latest Marathi News)
पक्ष कार्यालय स्थापन करण्याबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपमधील काही मंडळींनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. बीआरएसच्या विस्ताराची सुरुवातीला फारशी चर्चा नव्हती. परंतू अन्य पक्षातील कार्यकर्ते फोडणे तसेच पक्ष कार्यालय स्थापन होत असल्यने त्यांच्या वाढत्या अस्तित्वाची दखल पक्षांना घ्यावी लागणार असे दिसते.
ग्रामीण भागात बीआरएसचे बॅनर झळकत असताना आता मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यात राव यांचे बॅनर झळकू लागले आहे. उल्हासनगर येथील नेताजी चौकात बीआरएस पक्षाच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा होऊ लागली आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात त्यांचे दौरेही वाढू लागले आहेत. ग्रामीण भागातील राव यांना मिळणारा प्रतिसाद मोठा दिसून येत आहे. ग्रामीण भागाबरोबरच राव यांनी मुंबईच्या दिशेने आपली पावले वळविण्यास सुरुवात केल्याने प्रस्थापितांना ते येथे आव्हान देणार का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. (Latest Marathi News)
आगामी निवडणूकांत राज्यात बीआरएस पक्षाचे उमेदवार प्रस्थापितांना तोंड देणार का ? बीआरएसची भूमिका या निवडणूकीत किती राहील याचे ठोकताळे बांधण्यास राजकीय कार्यकर्त्यांत सुरुवात झाली आहे.