१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची त्यांच्या दालनात भेट घेतली.
१६ आमदारांच्या अपात्रतेचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले.
अध्यक्षांसोबत झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेच्या बाबतीत जे प्रकरण सोपवलं आहे, त्याबाबत लवकरात लवकर सुनावणी होईल, अशी आम्हाला खात्री असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
याआधी विधानसभेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिले होते. आजच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, शिवसेना ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, आमदार विलास पोतनीस, आमदार रवींद्र वायकर, आमदार रमेश कोरगावकर उपस्थित होते.
16 अपात्रांचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे
शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती. हे प्रकरण जवळपास 10 महिन्यांहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात होते. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपाने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नव्हता असे बोलले जात होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाच्या निकालाबाबतच्या सुनावणीवेळी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला. त्यामुळे आता 16 आमदार अपात्र ठरणार का? याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?
मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार नवा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या चर्चांनुसार, नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.