‘मविआ’वरून आंबेडकरांनी ठाकरेंना केलं अलर्ट, पवारांनी एका वाक्यात संपवला विषय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडीवरून धोक्याचा इशारा दिला आहे, तसंच याबाबत लवकर निर्णय घेण्याचा सल्लाही त्यांनी ठाकरेंना दिला आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या या विधानाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात उमटायला सुरूवात झाली आहे. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? ‘एका बाजूला महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आम्ही एकटे जाणार, असं म्हणत आहेत. दुसरीकडे एनसीपीमधले सगळे नेते गळाला अडकले आहेत. गळाला अडकलेले मासे तिहारमध्ये जाण्यापेक्षा आम्ही तुमच्याकडेच येतो, मग त्या पक्षाचं काय राहिल?
तिसरा आपला मित्र शिवसेना, त्यांच्याकडून तिघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चालला आहे. आमच्या राजकीय मित्रांना आम्ही सांगतो की पावलं ताबडतोब उचलली तर वाचू शकता’, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
‘आम्ही शिवसेनेसोबत जाणार हे आम्ही तेव्हा जाहीर केलं आहे.
विरोधी स्टेटमेंट आम्ही तरी केलंय का? त्यांनी तरी केलंय का? नाही. एनसीपी आणि काँग्रेसनं यावं, असा त्यांचा प्रयत्न आहे.
नाना पटोले यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. हवा कधी नरम, कधी गरम, अशी वक्तव्य नाना पटोले करतात. काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार, असं वक्तव्य ते करतात. महाविकासआघाडीमध्ये बसलं की म्हणतात एकत्र लढणार.
हा गुमराह करण्याचा भाग आहे, त्याचं टार्गेट कोण आहे? हे ठाकरेंनी लक्षात घ्यावं. एनसीपीची स्थिती लक्षात घ्या. जर त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला तर उद्धव ठाकरे गटाला अधिक चांगलं आहे. मी सावध राहा, अशी सूचना केली आहे’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. शरद पवारांची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंना दिलेल्या या सल्ल्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना उत्तर द्यायचं कारण नाही, त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.