नेत्यांवरील टीका महागात पडली…! माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पक्षविरोधी कारवाया आणि जाहीर वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसनं माजी आमदार आशिष देशमुख यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.
पक्षविरोधी वर्तनाबद्दल देशमुख यांना समाधानकारक उत्तर न देता आल्यानं पक्षानं ही कारवाई केली आहे. पक्षाविरोधी वर्तन खपवून घेणार नसल्याचा संदेशच काँग्रेसनं यातून दिला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी या संदर्भातील पत्रक प्रसिद्ध केलं आहे. ५ मार्च २०२३ रोजी काँग्रेसच्या शिस्तपालन समितीनं आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला देशमुख यांनी ९ एप्रिल २०२३ रोजी उत्तर दिलं. त्यावर समितीनं चर्चा केली. मात्र, देशमुख यांनी केलेला खुलासा अजिबात समाधानकारक नव्हता. त्यामुळं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वांच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. देशमुख यांचं प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी काढून घेण्यात आलं आहे.
आशिष देशमुख हे काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांचे चिरंजीव आहेत. आशिष देशमुख हे नागपूरच्या काटोल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी व पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात विधानं केली होती.
आशिष देशमुख हे स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत. वेगळ्या विदर्भाबाबत काँग्रेसची भूमिका आग्रहाची नाही. भाजप काही वर्षांपूर्वीपर्यंत आग्रही होता, मात्र केंद्रात व राज्यात पूर्ण बहुमताची सत्ता येऊनही भाजपनं स्वतंत्र विदर्भासाठी कसलीही हालचाल केली नाही. त्यामुळं ते भाजपमध्ये जाणार का याविषयी चर्चा आहे.
दोन-तीन दिवसांपूर्वीच आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. आता ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडं लक्ष लागलं आहे.