“मुख्यमंत्री भाऊराया ही साडी परत करते” दारूबंदी साठी फाटक्या साड्यांचा लढा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- यवतमाळ दारूबंदीच्या लढ्याला यश यावे यासाठी आम्ही सर्व ‘स्वामिनी’ संघटनेचे कार्यकर्ते सर्वतोपरीने प्रयत्न करीत होतो. वेगवेगळी आंदोलन करून सरकारचं आणि प्रसार माध्यमांच लक्ष वेधून घेत होतो.
यात एक विशेष आंदोलन झालं ते ‘फाटक्या साड्यांचे’!
मोर्चे, धरणे, सत्याग्रह हे आंदोलनात नेहमीच होत असतात. मात्र, यवतमाळ जिल्हा दारूबंदीच आंदोलन हे प्रत्येक दिवशी वेगळं असायचं. मला आठवते, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यामध्ये आंदोलन करायचं ठरलं…. आंदोलनाचा दिवस ठरला आणि शेकडो महिला एकत्रित जमल्या.
यातच माणिकवाडा या गावच्या काही महिलांनी एक निळसर पांढऱ्या रंगाची फाटकी साडी घेऊन आंदोलनात आल्या. म्हणाल्या, ”महेश भाऊ, या फाटक्या साडीसारख्याच आमचा संसार या दारूने फाडलाय…. या फाटक्या साडीवर आपण आपल्या वेदना लिहू, सर्व महिला स्वाक्षऱ्या करतील, आपलं म्हणणं देखील मांडतील आणि ही साडी आपण मुख्यमंत्र्यास पाठवू.” मी आणि आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी यास सहमती दिली
आणि सर्व महिलांनी त्याच्यावरती स्वाक्षऱ्या केल्या. कुणी वेदनेने भरलेल्या कविता लिहिल्या तर कुणी चारोळ्या, काहींनी दारूने उध्वस्त झालेल्या कुटुंबाचे चित्र काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या साडीवर एक मोठं हेडिंग लिहिल्या गेलं होतं, ”या फाटक्या साडीसारखा आमचा संसार दारूने फाडलाय सरकार..! तुम्ही तरी आमचा संसार वाचवा ना….
‘दारूबंदी झालीच पाहिजे’ असे नारे देत हा मोर्चा तहसील कार्यालयाकडे निघाला. मोर्चाच्या पुढे दहा पंधरा महिलांनी ही फाटकी साडी बॅनर सारखी पकडली. तहसीलच्या गेटवर आल्यानंतर पोलिसांनी आधी सांगितलं ही साडी ताबडतोब बाजूला ठेवा.
महिलांनी सांगितलं, आम्हाला ही साडी मुख्यमंत्री यांना पाठवायची आहे. पोलिस आणि प्रशासन म्हणाले, आम्ही साडी पाठवू शकत नाही. आम्ही स्वीकारणार नाही. सर्व महिला नाराज झाल्या. ‘यवतमाळ जिल्हा दारूबंदी करा’ ही मागणी निवेदनातून महिलांनी केली आणि सर्व महिला घरी परतल्या. प्रसारमाध्यमांनी टिपलेले फाटक्या साड्यांचे छायाचित्र संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. आम्ही याच साड्या घेऊन मुंबईच्या आझाद मैदानात बसलो. पावसाळी अधिवेशन सुरू होतं.
आता आंदोलनात शेकडो फाटक्या साड्या सहभागी झाल्या होत्या. गावागावातून स्वाक्षऱ्या घेऊन आलेल्या या फाटक्या साड्या आंदोलनात आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत होत्या. आणि मागणी करत होत्या आमच्या गावाची आणि जिल्ह्याची दारूबंदी करा…! मात्र हे निगरगट्ट सरकार कुठे ऐकतय. कारण, यांच्याच कार्यकर्त्यांची दारूची दुकाने आहेत. मग तो पक्ष सत्तेवर असो की विरोधी बाकावर!
ही स्वाक्षरी केलेली फाटकी साडी मुख्यमंत्र्यापर्यंत जावी आणि आमच्या भावना पोहचाव्या, अशी आमची मनोमन इच्छा होती. यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्नही केले पण यश नाही. अशातच रक्षाबंधनाचा दिवस आला. सर्व प्रमुख महिला कार्यकर्ते एकत्रित आले आणि त्यांनी पुन्हा या फाटक्या साडीवर स्वाक्षऱ्या केल्या. सोबत एक पत्र लिहिलं…
असं म्हणत भावनिक पत्र महिलांनी लिहिलं. ती साडी पॅक करून कुरिअरने मुंबई मंत्रालय येथे पाठवली.फाटकी साडी मंत्रालयात पोहोचली की नाही याचा पत्ता नाही. पोचली असेल तर मुख्यमंत्र्यांनी बघितली की नाही हेही माहीत नाही पण आमचा प्रयत्न आम्ही पूर्ण केलेला होता. फाटकी साडी मंत्रालयापर्यंत पाठवली त्यावर मुख्यमंत्र्यांनी आम्हास चर्चेस बोलावलं नाही. दारूबंदीचा प्रश्न आमचा तसाच राहिला. नव्या जोशाने नव्या उमेदीने पुन्हा नवीन काहीतरी करू हा विश्वास मनाशी घेऊन महिला पुन्हा उभ्या राहिल्या आणि स्वामिनी दारूबंदी आंदोलन पुढेही असंच सुरू राहिलं.
मुख्यमंत्री भाऊराया सप्रेम नमस्कार,
तुझ्याकडून आज रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून एक गोष्ट मागायची आहे. रक्षाबंधनाला भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो, नवी साडी घेतो मात्र ही साडी तुला परत करत आहे… या फाटक्यासाठी सारखाच दारूने माझा संसार फाडलाय रे! तू माझा संसार वाचवू शकतो. तू विचार कर की आपल्या बहिणीची जी अवस्था या दारूने केली ती दारू बंद करणार आहेस की नाही..!