शरद पवार फेरविचार करणार..! तासाभराच्या बैठकीनंतर अजित पवारांकडे दिला ‘हा’ निरोप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावूक झाले आहेत. ‘सिल्व्हर ओक’बाहेर कार्यकर्त्यांनी धरणं दिले.
अजित पवार बोलतांना म्हणाले की, पवार साहेब असा निर्णय घेतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं.
कार्यकर्ते शांत होत नव्हते म्हणून पवार साहेबांनी आवाहनही केलं होतं. परंतु कार्यकर्ते शांत बसले नाहीत.
‘आम्ही नेत्यांनी मिळून साहेबांशी चर्चा केली आहे. ते म्हणाले माझा निरोप द्या. तुमच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस द्या.’ असा निरोप पवारांनी धाडल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावं, राज्यातल्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असंही पवारांनी सांगितलं आहे. दोन-तीन दिवसांमध्ये निवृत्तीबाबात शरद पवार निर्णय घेणार आहेत.
त्यामुळे शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी धरणं धरुन बसलेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावी जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांचे राजीनामे स्विकारले जाणार नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं.
शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे.
त्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांना विनंती देखील केली. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि इतर मोठे नेते भावुक झाले. यावेळी काही नेत्यांना कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. आता पवारांच्या आगामी भूमिकेकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.