खारघर दुर्घटनेप्रकरणी सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण, म्हणाले. “उष्माघात हा नैसर्गिक”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदान करण्यात आला. मात्र कडक उन्हात हा सोहळा घेण्यात आल्याने उष्माघाताने तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली. याशिवाय या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. यावर आता सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा उष्माघात नैसर्गिक असल्याचे विधान केले आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेलं काम मोठं आहे. आप्पासाहेबांसाठी श्रीसेवक आले होते. आलेले श्रीसेवक हे अप्पासाहेबांच्या प्रेमापोटी आले होते कोणी गाड्या पाठवून आणलेले लोकं नव्हती. कार्यक्रम जर रात्रीचा ठेवला असता तर कार्यक्रमानंतर घरी जाताना श्रीसेवकांना अडचण होईल म्हणून कार्यक्रम दुपारी घेतला. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय व्यवस्थित केले होते. जवळपास 40-60 पानाचं प्लॅनिंग बुकलेट होतं. अतिशय सूक्ष्म नियोजन केलेलं होतं. उष्णता इतकी वाढेल याची कोणाला कल्पना नव्हती. लोकांजवळ असलेले पाणी संपलं असताना देखील जागेवरून उठून गेले नाही. 20-25 लाख लोकांना बसता येईल असं मंडप घालणं अशक्य आहे. अशी दुर्दैवी घटना घडेल असा कोणी विचार देखील नव्हता केली.”
पुढे त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर देत म्हंटले की, “मत मिळावी म्हणून जर कार्यक्रम असेल तर विरोधकांचे सभा देखील सुरु आहेत ते देखील मतांसाठीच सुरू आहे का? जखमीचे पूर्ण उपचार खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशीसाठी अधिकारी नेमला आहे, सगळं नियोजन करून देखील दुर्दैवी घटना घडली.” सर्वपक्षीयांनी राजकारण करण्यातच धन्यता मानली असल्याची टीका देखील यावेळी मुनगंटीवार यांनी विरोधकांवर केली.
मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – बाळासाहेब थोरात
तर, दुसरीकडे आमदार बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी खारघर दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. “आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण देण्याचा कार्यक्रम केला. यावर कोट्यवधीपेक्षा अधिक खर्च झाला. प्रचंड उन्हात हा कार्यक्रम घेण्यात आला. अनेकांना याचा त्रास झाला. मोठा खर्च करुन ही नागरीकांना उन्हात बसावे लागले. अनेकांच्या पोटात अन्नपाणी नसल्याचे उघड झाले. त्यातून सरकारची क्रुरता यातून दिसुन येते.
या घटनेला शिंदे – फडणवीस सरकार जबाबदार असून व्हिआयपींना सावली व्यवस्था. लाखो साधकांना उन्हात बसावे लागल्याने यात 14 पेक्षा अधिक साधकांचा मृत्यू झाला असून हा मोठा गुन्हा सरकारकडून घडला. त्यामुळे आता नैतिकेच्या आधारावर मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली होती.