आपण सत्तेसाठी जन्माला आलो नाही….! देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आपण सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. सत्ता हे आपल्यासाठी आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडविण्याचे एक साधन आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले.
तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने राज्यातील सर्व ४८ आणि विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.
भाजपच्या स्थापना दिना निमित्ताने फडणवीस यांच्या हस्ते शीव येथे दोन ठिकाणी बावनकुळे यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात ध्वजवंदन आणि अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाजप खासदार, आमदार व अन्य नेत्यांनीही विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, सत्ता हे आपल्यासाठी आर्थिक परिवर्तनाच्या लढाईतील एक उपकरण आहे. गरीब कल्याण हे आपले ध्येय असून त्यादृष्टीने अर्थसंकल्पात गरिबांसाठी १० लाख घरे, शेतकऱ्यांना एक लाख रुपयांत विमा, पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार आदी अनेक योजना आपण सुरू केल्या आहेत.
भाजपचे १९८४ मध्ये दोन खासदार होते. काँग्रेसला पर्याय देऊ, असे सांगितल्यावर आपली टिंगल केली जात असे. पण माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९९६, ९८ व नंतर ९९ मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आले व पाच वर्षे टिकले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये भाजप सरकार गरीब कल्याणाचे उद्दिष्ट ठेवून सत्तेवर आले आहे. मोदींचे नेतृत्व जागतिक पातळीवर गेले असून भाजप हा आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, असे फडणवीस म्हणाले.
प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर आदी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या त्यागावरच पक्ष उभा- बावनकुळे
या कार्यक्रमात बावनकुळे म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल काळात हजारो कार्यकर्त्यांनी जनसंघ आणि त्यानंतर भाजपची विचारधारा रुजविण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यकर्त्यांनी केलेल्या त्यागावरच आज पक्ष उभा आहे. भाजपची स्थापना करताना वाजपेयी यांनी समृद्ध, विकसित व बलशाली भारताचे स्वप्न पाहिले होते. मोदी यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. त्यामुळेच भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे.