दुग्धजन्य पदार्थाची आयात नको…! राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- करोनाच्या साथीतून सावरणाऱ्या दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांचा विचार करून केंद्र सरकारने दुग्धजन्य पदार्थाची आयात करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रीय पशू व दुग्धमंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.केंद्र सरकार तूप आणि लोणी यासारख्या दुग्धजन्य पदार्थाची आयात करणार आहे.
यावरून केंद्र सरकारचा हेतू लक्षात येतो. या संदर्भातील केंद्र सरकारचा कोणताही निर्णय हा स्वीकार करण्याजोगा नाही. याचे कारण म्हणजे करोनाच्या साथीतून दूध उत्पादक शेतकरी, व्यावसायिक आता कुठे सावरत आहेत.
अशावेळेस सरकारने असा कुठलाही निर्णय घेणे योग्य नाही. अशा प्रकारच्या उत्पादनाच्या आयातीचा देशाअंतर्गत दूध उत्पादन करणाऱ्या उत्पादकांवर थेट परिणाम होतो. आयातीचा परिणाम देशातील दूध व्यावसायिकांच्या उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. दुधाच्या बाबतीत क्रांती केलेल्या भारताला आता दुग्धजन्य पदार्थ आयात करावे लागत आहेत याबद्दलही पवार यांनी खंत व्यक्त केली.दूध उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. २०२१-२२ मध्ये जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा जगाच्या तुलनेत २४ टक्के इतका होता. मात्र गेल्यावर्षी आलेल्या रोगराईमुळे देशात १लाख ८९ हजार दुभत्या जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.