राष्ट्रवादीच्या फुटीचा मुहूर्त ठरला..? अजित पवारांच्या प्रयत्नांना अपयश..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ठाण्यातील नगरसेवकांची काही दिवसांपूर्वी तातडीची बैठक बोलावली. नगरसेवक फुटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना 1 ते 2 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.
त्यांच्या या आरोपानंतर निष्ठावान कोण हे पाहण्यासाठी आजची बैठक बोलावण्यात आली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्या या आरोपानंतर अजित पवार यांनी या नगरसेवकांची बैठक बोलावली होती. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश करण्यासाठी 1 ते 2 कोटींची ऑफर दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला या संपूर्ण प्रकरणाला गांभीर्याने घेत अजित पवार यांनी सर्व नगरसेवकांची एक बैठक घेतली. नगरसेवक फुटू नयेत किंवा ऑफरमुळे राष्ट्रवादीत फुट पडू नये यासाठी अजित पवार यांनी धावाधाव सुरु केली आहे.
तर गेले अनेक दिवस ठाण्यात सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या चर्चेला आता मूर्त स्वरूप देण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी १२ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरवण्यात आला असून या दिवशी मुंब्य्रातील काही माजी नगरसेवकांसह ठाण्यातील ज्येष्ठ माजी नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाण्यात पुन्हा एकदा राजकीय धमाका होण्याची शक्यता आहे.
आव्हाड यांचे ट्विटर बॉम्ब, त्यानंतर कळवा परिसरात रंगलेले बॅनर युद्ध, या सर्व घडामोडींआधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवकांचे बाळासाहेबांची शिवसेनेसोबत जाण्याचे संकेत मिळू लागले होते. त्यातच शनिवारी पालिका मुख्यालयाच्या हिरवळीवर बसून १२ फेब्रुवारीला बारा वाजवणार, असा केलेला दावा आणि सायंकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाला नजीब मुल्लांसह राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी लावलेली हजेरी, त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’ म्हणत केलेले ट्विट यावरून ठाण्यात राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
या काळात राष्ट्रवादीचे १२ ते १५ माजी नगरसेवक पक्षाला रामराम करणार असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे, पण राष्ट्रवादीच्या विश्वसनीय सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार मुंब्य्रातील किणे कुटुंब आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्याव्यतिरिक्त एकही माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागणार नाही. त्यामुळे १२ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे किती माजी नगरसेवक, पदाधिकारी पक्षांतर करतील याचे चित्र त्यादिवशीच स्पष्ट होणार आहे.
ठाण्यात वास्तविक सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण राहिले आहे. दिवंगत वसंत डावखरे, गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड हे तीन गट नेहमीच पाहायला मिळाले. वसंत डावखरे यांच्या निधनानंतर गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांचे राजकीय वजन वाढले. त्यात एकदा राज्यमंत्रीपद आणि त्यानंतर मंत्रीपद मिळाल्याने त्यांचा दबदबा वाढला. त्यामुळे काही ज्येष्ठ, जुनेजाणते नगरसेवक साईड ट्रॅकवर गेले. या दुखऱ्या नसचा उपयोग ठाण्यात आव्हाडांना घेरण्यासाठी आणि राष्ट्रवादीला फोडण्यासाठी सध्या कामी येत आहे.