उमेदवार जाहीर केले असले, तरीही बिनविरोधसाठी भाजपचे प्रयत्न सुरुच….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यात निधन झालेल्या आमदारांच्या कुटुंबातील उमेदवार असेल, तर संबंधित ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी अपवाद झाला असेल, असे म्हणत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना चिंचवडची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केलं आहे.
आमदारांच्या निधनामुळे होत असलेल्या कसबा पेठ आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार आज जाहीर केले. तरीही त्यानंतर या दोन्ही निवडणुका बिनविरोध करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरुच आहेत. त्यांचे रणनितीकार व ट्रबल शूटर असलेले मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीच पिंपरी-चिंचवडमध्ये आज याला दुजोरा दिला.
चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना पक्षाची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आज एका राज्य कार्यशाळेसाठी महाजन पुण्यात बाणेर (Pune) येथे आले होते. त्यावेळी महाजनांनी जगताप कुटुंबांची पिंपळे गुरव येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना चिंचवड निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केलं.
गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, “चिंचवड हा भाजपचा बालेकिल्ला असून तेथे पक्षाचा विजय शंभर टक्के निश्चीत आहे. निधन झालेल्या आमदारांच्या कुटुंबातील उमेदवार असेल, तर ती निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा आहे. ती विरोधकांनी पाळावी.”
यावर भाजपनेही यापूर्वी प्रथा मोडल्याची आठवण त्यांना करून देण्यात आली. त्यावेळी सारवासारव करीत महाजन म्हणाले, “खरं तर अशा वेळी निवडणूक बिनविरोध करायला हवी. तशी परंपरा आहे. काही ठिकाणी अपवाद असू शकतो. तसेच उमेदवार दिले असले, तरी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आमचे प्रयत्न सुरुच आहेत,” अशी कबुली त्यांनी दिली.
यानंतर त्यांनी जगताप कुटुंबाबाबत माहिती दिली. महाजन म्हणाले, “जगताप कुटुंबात कसलाच वाद, नाराजी आणि उमेदवारीवरून संघर्ष नाही. लक्ष्मणभाऊ असतानाची परिस्थिती होती आजही तशीच आहे. हा वाद व संघर्ष मीडियानेच उभा केला आहे. उलट या निवडणुकीची धुरा सोपविण्यात आल्याने शंकर जगताप यांची जबाबदारी आता वाढली आहे”, असेही ते यावेळी म्हणाले.