बच्चू कडूंचं सूचक विधान; ‘मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही’

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- माजी मंत्री आणि प्रहार पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू दिवसेंदिवस शिंदे-फडणवीस सरकारवर नाराज होताना दिसत आहेत.
जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळी मंत्री पद मिळालं नाही म्हणून जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. दरम्यान, त्यांनी आता सूचक विधान केलं आहे. यंदाच्यावर्षी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असं वक्तव्य कडू यांनी केलं आहे.
रकार स्थापन होऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीही या सरकारचा अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून दररोज मंत्रीमंडळ विस्ताराच्या नवनवीन तारखा दिल्या जात आहेत.
अशातच बच्चू कडू यांनी यावर पुन्हा भाष्य केलं आहे. आपण जेव्हा सत्ताधारी पक्षातील आमदारांशी बोलत असतो, तेव्हा २०२४ नंतरच मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं सांगत असतो. असं बच्चू कडू म्हणाले.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?
दिव्यांग मंत्रालयाचं मत्रीपद तुमच्याकडे कधी येणार आहे? असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “मला वाटतं, हा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विचारायला हवा. आम्ही सर्व आमदार जेव्हा एकत्र बसत असतो. तेव्हा मी त्यांना सांगत असतो की, २०२४ नंतरच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.”
मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाबाबत विचारलं असता बच्चू कडू मिश्किलपणे म्हणाले की, “एवढ्यात मंत्रीमंडळ विस्तार झाला तर आम्ही तुम्हाला पेढे भरवू.. पण आम्ही सगळ्या आमदारांनी आता आमची मानसिकता तयार करून ठेवली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात तुम्ही डोकं नका लावू, काहीतरी काम करा. असही बच्चू कडू म्हणाले.