आज गावगाड्यात रणधुमाळी, सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान, हजारो उमेदवार मैदानात ; एकट्या विदर्भात एकूण 2,276 ग्रामपंचायतची निवडणूक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू होता. सर्वच प्रकारे उमेदवारांनी मतदारांजवळ जाण्यासाठी कस लावला. आता आज प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी असणार आहे.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या
अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.
गावागावात पोलिसांचा फौजफाटा
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात असतील. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे. याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये हजारोंच्या संख्येनं आहेत.
एकट्या विदर्भात एकूण 2,276 ग्रामपंचायतची निवडणूक
एकट्या विदर्भात एकूण 2,276 ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून आज त्या त्या गावात पोलिंग पार्टी रवाना होतील. विदर्भामध्ये दोन प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर जिल्ह्यात 236 तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात 305 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. सोबतंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गावामध्येसुद्धा निवडणूक होत आहे. या व्यतिरिक्त विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ज्यात सुनील केदार, यशोमती ठाकूर, बच्चू कडू, मंत्री संजय राठोड यांच्या सारखे सारखे दिगग्ज नेत्यांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये होणार निवडणुका
नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये निवडणुका होणार आहेत. एकूण 745 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.एकूण सदस्य पदासाठी 2897 तर सरपंच पदासाठी 577 उमेदवार रिंगणात आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी
कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी जोरात सुरु आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सरपंचपदासाठी 1 हजार 456 उमेदवारांनी माघार घेतल्याने सरपंचपदासाठी 1 हजार 193 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 हजार 362 उमेदवारांनी माघार घेतल्याने 8 हजार 995 उमेदवार रिंगणात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 293 ग्रामपंचायतीत मतदान होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 325 ग्रामपंचायतीपैकी 293 ग्रामपंचायतीसाठी 933 केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठीच्या मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक
अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 14 तालुक्यांतील 2 हजार 97 पदांसाठी 4 हजार 796 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे 257 सरपंचपदासाठी तब्बल 1279 उमेदवार झुंज देत आहेत. यंदा थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने चुरस आणखी वाढली आहे.विशेष म्हणजे यापूर्वी सहा सरपंच व 413 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
नागपूर जिल्ह्यात 236 सरपंच पदांसाठी 761 उमेदवार
राज्यात सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 236 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होत असून त्यासाठी 761 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहे. तर याच 236 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 2054 सदस्य पदासाठी एकूण 4891 उमेदवार रिंगणात आहे.
सोलापूरमध्ये 1418 जागांसाठी मतदान
सोलापूर निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत एकूण 189 आहेत. यामध्ये 1752 जागांवर निवडणूक होईल. त्यापैकी 329 बिनविरोध निघाल्या आहेत. उर्वरित 1418 जागांसाठी मतदान प्रक्रिया होईल. सरपंचपद वगळून 20 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.. सरपंचसहित 15 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.
बीड जिल्ह्यात 670 सरपंच पदासाठी 1 हजार 932 उमेदवार रिंगणात
बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित 670 ग्रा.पं.साठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर ग्राम पंचायत सदस्यपदासाठी 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार मैदानात आहेत. जिल्ह्यात 185 मतदान केंद्रे संवेदनशील असून अन्य काही केंद्र अतिसंवेदनशील आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे
अहमदनगर जिल्ह्यात 15 सरपंच बिनविरोध
अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यात 1965 सदस्यांपैकी 301 सदस्य बिनविरोध झाले, तर 15 सरपंच बिनविरोध झाले. जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत, तर 2 ग्रामपंचायतमध्ये समोरच्या पॅनलचे सर्व अर्ज बाद झाल्याने तिथेही निवडणूक बिनविरोध झाली. म्हणजे जिल्ह्यात एकूण 13 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता 203 पैकी 190 ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे.