अबब….केवढा तो बंदोबस्त…! नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी ७ हजार पोलिस….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- आगामी हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी राज्यभरातून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपराजधानीत दाखल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातून बंदोबस्ताचे नियोजन सुरू असून पोलीस वाहनांचा मोठा ताफा शहरात संरक्षण व नियंत्रणासाठी सज्ज झाला आहे.
हिवाळी अधिवेशनास १९ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्यासाठी बाहेर जिल्ह्यातून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे ताफे नागपुरात दाखल झाले आहेत. शुक्रवारपासून सर्व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होणार आहेत. पोलीस आयुक्तालयाने बंदोबस्ताचे नियोजन केले असून शहरात अधिवेशनासाठी निवासस्थानापासून ते जेवणापर्यंतची तयारी केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बंदोबस्तासाठी राज्यभरातून शहरात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेणे सुरू केले आहे. हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी ७ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) सात तुकड्यांचा समावेश आहे. आधुनिक सुविधा असलेली ५ सुसज्ज अशी दक्षता वाहने, एक हजार होमगार्ड, १२ बॉम्ब शोधक-नाशक पथकांसह विशेष कमांडो सुरक्षेसाठी सज्ज आहेत. शुक्रवारी विधानभवनासह शहरातील बंदोबस्ताचा आढावा पोलीस पोलीस आयुक्त घेणार आहेत.
नुकताच पंतप्रधान मोदी यांच्या आगमानमुळे गेल्या ६ दिवसांपासून पोलीस कर्मचारी बंदोबस्तात होते. त्यानंतर लगेच हिवाळी अधिवेशनाचा बंदोबस्ताच्या तयारीला लागले. त्यामुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
दाभ्यात नवे डिटेंशन सेंटर
हिवाळी अधिवेशनादरम्यान मोर्चेकरी किंवा आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर बंदिस्त ठेवण्यासाठी दाभा परीसरात नवीन डिटेंशन सेंटर तयार करण्यात आले आहे. तसेच मुख्यालयातसुद्धा डिटेंशनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. शुक्रवारपासूनच शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू होणार आहे. विधानभवन, नागभवन, रविभवन आणि आमदार निवास यासह अन्य काही ठिकाणी ‘सीसीटीव्ही’द्वारे नजर ठेवली जाणार आहे.
वाहतुकीची कोंडी नियोजनअभावी अटळ
विविध सामाजिक संघटना आणि शासकीय कर्मचारी आपापल्या रास्त मागण्यांसह अधिवेशनादरम्यान विधानभवनावर धडकतात. मोर्चेकऱ्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक बाधित होते. यावर्षी वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन दिसत नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी अटळ आहे. अधिवेशनादरम्यान वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसू शकतो.