शिंदे गटात गेलेले सगळे दलाल, सगळी झुंड आमच्या दारात उभी राहील ; राऊतांचा हल्लाबोल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिंदे गटात (Shinde Group) गेलेल्या लोकांना श्रद्धा, निष्ठा हा विचार नाही. जे गेले आहेत, त्यांचा सगळ्यांचा व्यवहार आणि व्यवसाय दलाली असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.
ज्याच सरकार येतं तिकडे हे लोक जात असतात असेही राऊत म्हणाले. 2024 ला ही सगळीच्या सगळी झुंड परत आमच्या दारात उभी राहीलेली दिसेल. फक्त त्यांच्या गळ्यातील दुपट्टे बदलतील असेही राऊत यावेळी म्हणाले. ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. नाशिकमध्ये (Nashik) माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावर संजय राऊतांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता राऊत बोलत होते.
ज्या दिवशी हे सरकार पडले, त्या दिवशी …
महाराष्ट्रातून जी काही लोकं शिंदे गटात सामील झाली आहेत, एकतर ती दलाल आहेत. दोन नंबरचे त्यांचे धंदे आहेत. तसेच लालच दाखवून त्यांच्यावर दबाव आणून प्रवेश केले जात असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. या सगळ्यांचे दारु, जुगार, मटका असे धंदे आहेत. बनावट दारुचा व्यवसाय करणारे काही लोक आहेत. त्यांना कोणत्या पक्षाशी निष्ठा नसल्याचे राऊत म्हणाले. जे लोक तिकडे गेले त्याचे आम्हा दु:ख नाही. ज्या दिवशी हे सरकार पडले, त्या दिवशी हे लोक आमच्या दारात उभे असतील असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार
मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चाला परवानगी मिळणार. जर तसे झाले नाहीतर त्याचे परिणाम वेगळे होतील असा इशारा संजय राऊतांनी दिला. एकीकडे महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान सुरु आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सीमाप्रश्नाबाबत फुरफुरत आहेत. राज्यातील उद्योग बाहेर जातातेय. हा महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय असल्याचे संजय राऊत म्हणाले. संयुक्त महाराष्ट्राच्या काळात महाराष्ट्र प्रेमींचे मोर्चे निघाले होते. तशाप्रकारचा मोर्चा उद्या निघणार आहे. घटनाबाह्य पद्धतीचं सरकार महाराष्ट्रात बसलं आहे. आम्ही कोणतंही काम घटनाबाह्य करत नाही. हे सरकार लोकशाही पद्धतीला विरोध करत असल्याचे राऊत म्हणाले. आम्ही लोकशाही मार्गाने चाललो आहोत. त्याच मार्गाने आम्ही तुम्हाला सत्तेवरुन खाली खेचू अशेही राऊत यावेळी म्हणाले. उद्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह समविचारी पक्षांचा मुंबईत मोर्चा निघणार आहे. अद्याप या मोर्चाला सरकारकडून परवानगी मिळाली नाही. याबाबत संजय राऊत बोलत होते. मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करणार नाही असे राऊत म्हणाले.