राज्यात ‘या’ ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपुर :- बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी वातावरणामध्ये चांगलाच बदल होताना दिसत आहे. ऐन हिवाळ्यामध्ये अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. तर बुधवारी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.
तर, येत्या 24 तासात राज्यातील काही ठिकाणी पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. 14 डिसेंबर (बुधवारी) राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचून, वाहतुकीची कोंडी झाली होती.
त्याचबरोबर अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. दरम्यान, सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते. राज्यामध्ये वाशिम, नंदुरबार, बुलढाणा, हिंगोली, रायगड, पालघर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून ढगाळ वातावरण होते.
तर, काल जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुलढाणा शहर आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्याचे रब्बी पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. काल वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाने धुमाकूळ घातला. वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री उशिरा अवकाळी पावसाने हजेरी लावली.
वाशिममध्ये सलग दोन दिवसापासून अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना धोका वाढला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आधीच पीक संकटात आल्यानंतर आता त्यामध्ये अवकाळी पावसाची भर पडली आहे. दरम्यान, राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि शहादा परिसरामध्ये काल जोरदार पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यातील केळी, मिरची, कापूस आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर राज्यात नाशिक, हिंगोली, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये देखील पावसाने धुमाकूळ घातला. पालघर जिल्ह्याने अचानक हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले असून, वीटभट्टी व्यवसायिक देखील संकटात सापडले आहे.