शहांची नको मोदींची मध्यस्थी हवी ; उदयनराजेंची आग्रही भूमिका……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सातारा :- कालच्या बैठकीनंतरही महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अद्यापही राजकीय मतमतांतरं सुरुच आहेत. यावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी टिप्पणी केली असून या वादामध्ये गृहमंत्री अमित शहांची नव्हे तर पंतप्रधानांची मध्यस्थी गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
त्यामुळं पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, भाषावर प्रांतरचना होणं अपेक्षित होतं पण तशी झाली नाही. यासाठी महाजन समिती नेमली गेली, पण या समितीलाही हे जमलं नाही. तुमच्या राजकारणामुळं सीमाभागातील लोकांची प्रगती खुंटली आहे. अशा विषयांमध्ये चर्चा किंवा मध्यस्थी पंतप्रधानांनी करणं गरजेचं आहे.
पंतप्रधानांनी राज्यातील नेत्यांची बैठक घ्यावी
संबंधित राज्यातील प्रमुख राजकीय नेते, पक्ष आणि संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी भूमिकाही यावेळी उदयनराजे यांनी मांडली. सीमाभागात राहणारे लोक महाराष्ट्रातील असोत किंवा कर्नाटकातील त्यांची यामध्ये काय चूक आहे. याबाबत तुम्ही माणुसकीचा विचार करणार आहात की नाही? असा सवालही यावेळी उदयनराजे यांनी केला आहे.
अमित शहांच्या उपस्थितीत पार पडली बैठक
आठवड्याभरापूर्वी झालेल्या महाराष्ट्र-कर्नाटक तणावाच्या पार्श्वभूमीवर काल यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बैठकीसाठी निमंत्रण दिलं होतं. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. याप्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त ट्विट आपण केलेलंच नव्हतं असं बोम्मई यांनी दिलं होतं.