सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार, विश्व वारकरी संघ राज्यभर गुन्हे दाखल करणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वारकरी संतांच्याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अडचणी वाढल्या आहेत.
अंधारे यांनी माफी मागितल्यानंतरही वारकरी संप्रदाय शांत होण्यास तयार नसून आता राज्यभर सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी विश्व वारकरी संघाने सुरु केल्याचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज देशमुख यांनी जाहीर केले आहे.
वारकरी संतांच्याबाबत वक्तव्यानंतर काल सुषमा अंधारे यांनी माफी मागितली असली तरी यावर वारकरी संप्रदायाचे समाधान झालेले नसून त्यांचे विरोधात राज्य सरकारने गुन्हा दाखल करण्याची मागणी विश्व वारकरी संघाच्या तुकाराम चौरे महाराज यांनी केली आहे.
महानुभाव संप्रदायात देखील संतापाची लाट
सुषमा अंधारे यांनी भगवान श्रीकृष्णा विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने महानुभाव संप्रदायात देखील संतापाची लाट असून अंधारे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ भगवान श्रीकृष्णासमोर घेण्याची मोहीम गावोगावी राबवली जाणार आहे. याची सुरुवात औरंगाबाद येथील महानुभाव आश्रमातून झाली आहे.
News Reels
वारकरी संप्रदायाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून राजकीय नेत्यांनी वारकरी संप्रदायातील संतांवर अशा पद्धतीची वक्तव्ये केली तर त्याची किंमत त्यांना भोगावी लागेल असा इशारा विश्व वारकरी संघाचे अध्यक्ष जगन्नाथ महाराज यांनी दिला आहे. राज्यातील 36 जिल्हे आणि 270 तालुक्यात पसरलेल्या या संघटनेने आपल्या गावोगावच्या पदाधिकाऱ्यांना सुषमा अंधारे यांच्या विरोधात तक्रार देण्याच्या सूचना दिल्याचे जगन्नाथ महाराज देशमुख यांनी सांगितले.
कडक कायदा करण्याची मागणी
दरम्यान वारकरी संत आणि थोर महापुरुषांच्याबाबत वारंवार अपमानजनक वक्तव्ये येत असताना राज्य शासनाने याच्या विरोधात कडक कायदा करण्याची मागणी वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे ज्ञानेश्वर जळगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर आता महिला कीर्तनकार देखील आक्रमक भूमिका घेऊ लागल्या असून हिंदू देवदेवता आणि वारकरी संतांच्या अपमाना नंतर शांत कसे राहायचे असा सवाल महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांनी घेतली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वारकरी संप्रदायाची नेहमीच आधार आणि आदरयुक्त होते मात्र आता हिंदू आणि वारकरी संप्रदायाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अशा विकृती उद्धव ठाकरे यांनी पटकन पक्षातून काढून टाकाव्यात अशी भूमिका आंधळे यांनी घेतली आहे. सुषमा अंधारे यांची भूमिका हिंदुत्ववादी शिवसेनेत आता अडचणीच्या ठरू लागल्याने शिवसेना आणि अंधारे यांच्या समोरच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. वारकरी संप्रदाय हा सर्व जाती धर्म आणि राजकीय पक्षाला सामावून घेणारा असताना त्यांच्यावर भाजपचा शिक्का मारण्याचा अंधारे यांचा प्रयत्न त्यांनाच अडचणीत आणणारा ठरू लागला आहे.