समृद्धी महामार्गाला नाव बाळासाहेबांचं, पण नातवालाच बोलावलं नाही; आदित्य ठाकरे म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्प्याचा लोकार्पण सोहळा नागपूरमध्ये पार पडला. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे.
मात्र या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. याबाबत आमदार आदित्य ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. ते आरेतील सावरकर उद्यानात बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आम्हाला कोणतंही आमंत्रण आलेलं नाही.
आम्हाला आमंत्रण का दिलं नाही हे सरकारला तुम्हीच विचारा अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी आमंत्रण नसल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली.
आरेतील मेट्रो कारशेडला आमचा विरोध कायम असेल. मेट्रो आणि कारशेडला हा विरोध नाहीय, पण जंगलहानी करून होत असलेल्या कारशेडला हा विरोध असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने आरेचा 826 एकर परिसर जंगल म्हणून घोषित केला.
इतकंच काय तर आरेतील काँक्रिटचा रस्ता आम्ही केला. राजकारण्यांना लाज वाटायला हवी की अजूनही आदिवासिंचा विकास झाला नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
शिंदे गटासह राज्य सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरेंनी काही आरोपही केले. निर्भया निधीतून पथकासाठी राखीव जीप्स घेतल्या त्या आज गद्दा्रांसाठी वापरल्या जातायत असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच सुप्रिया सुळे यांच्यावर या गद्दार सरकारमधील एका मंत्र्यांनं आक्षेपार्ह भाषा वापरली त्याच्यावर कारवाई नाही.स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव असलेल्या या वास्तूत अन्याय सहन न करण्याची भाषा निघेल. आपलं सरकार येणार,पुन्हा वेगानं शाश्वत विकास करणार असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.