मराठीतून भाषणाची सुरुवात अन् विदर्भातील अकरा प्रकल्पांचं उद्घाटन ; आपल्या भाषणात काय म्हणाले मोदी…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- आज संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्तावर अकरा ताऱ्यांचा हा विकासाचा नक्षत्र योग जुळून आला आहे. हा अकरा ताऱ्यांचा विकासाचा नक्षत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवीन गती देणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत.
आज नागपूर दौऱ्यादरम्यान विविध अकरा विकास प्रकल्पाचे उद्घाटन, लोकार्पण कार्यक्रमानिमित्त मिहानमधील एम्स रुग्णालय परिसरात पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत केली. मोदी म्हणाले की, ‘आज संकष्ट चतुर्थीनिमित्त टेकडीच्या गणपती बाप्पाला माझं नमन’, मोदींनी असं म्हणताच उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. आजच्या आपल्या नागपूर दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण, नागपूरातील एम्स रुग्णालयाचे राष्ट्रार्पण, नॅशनल इस्टिट्यूट ऑफ वन हेल्थ केंद्र, रक्तसंबंधीत रोगांवरील अनुसंधान केंद्र -चंद्रपूर, पेट्रो केमिकल महत्त्वाचे केंद्र-चंद्रपूर, नागपूर नाग नदी प्रकल्पाच्या विकास आणि स्वच्छतेचा प्रकल्प, नागपूर मेट्रोच्या फेज एकचे लोकार्पण आणि दुसऱ्या फेजचे भूमिपूजन, नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा, नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास प्रकल्प, अजनी येथे 12 हजार हॉर्सपावर क्षमतेच्या रेल्वे इंजिन मेनटेंनस डेपो निर्मिती, रेल्वेच्या कोली नरकेट प्रकल्पाचे उद्घाटन ही सुमारे 75 हजार कोटींच्या 11 विकास प्रकल्पाचे उद्घाटन/ लोकार्पण केलं. हे अकरा महत्त्वकांशी प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असून याद्वारे या भागांचा सर्वांगिण विकास होणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, “देशात आणि राज्यात संवेदनशील सरकार असून प्रत्येक प्रकल्पात मानवी संवेदना असल्याने प्रत्येकाचा विकास सरकार साधत आहे. समृद्धी महामार्गामुळे शेतकरी उद्योग प्रवासी विविध धार्मिक क्षेत्रातील भाविक या सर्वांना सेवा मिळणार आहे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. आज होत असलेल्या सर्व प्रकल्पांच्या लोकार्पण उद्घाटन भूमिपूजनात पायाभूत सोयी संदर्भात वेगळं चित्र दिसून येत आहे. एका बाजूला एम्स सारखा रुग्णालय आहे, दुसऱ्या बाजूला समृद्धी सारखा महामार्ग आहे. तिसऱ्या बाजूला मेट्रो आणि रेल्वेचे प्रकल्प आहेत. हा विकासाचा एक पुष्पगुच्छ असून हे सर्व प्रकल्प एकत्र आल्याने राज्यात विकासाचा सुगंध दरवळत आहे.”
सर्वांच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा शिक्षण काही लोकांपर्यंत मर्यादित होते, तेव्हा देशाची खरी प्रतिभा समोर येत नव्हती. जेव्हा बँकिंग आणि व्यापाराच्या सेवा काही लोकांपर्यंत मर्यादित होत्या, तेव्हा त्याचा लाभ मर्यादितच होता. त्यामुळे समाजाचा एक मोठा घटक विकासापासून वंचित होता. जे वंचित होते, ज्यांना छोटं समजलं जात होते. ते आज आमच्या सरकारमध्ये प्राधान्यावर आहे. छोटे शेतकरी असो किंवा रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या सर्वांनाच सरकारमध्ये प्राधान्यावर आहेत. त्यांना लाभ मिळत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.