राज्यपालांनी माफी मागितली नाही याची खंत आहे :- उदयनराजे भोसले…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. भाजपा खासदार आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी हा विषय उचलून धरला आहे.
आज त्यांनी पंतप्रधान मोदी आणि राज्यसभा खासदारांची बैठक घेतली. यात या मुद्द्यावर भाष्य केलं.
या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “राज्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने शिवरायांचा अवमान झाला, त्याबद्दल राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. ते पत्र प्रक्रियेनुसार गृहमंत्रालयाकडे गेलं आहे. आता आज पंतप्रधान मोदींना पत्र दिलं आहे. कोणताही विषय जास्त वाढू नये, राज्यामध्ये तेढ निर्माण होऊ नये. यासाठी लवकरात लवकर तोडगा निघणं गरजेचं आहे.”
राज्यपालांवर कारवाई होणार याची खात्री असल्याचंही उदयनराजे म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं, “माझी भूमिका मी पंतप्रधान मोदी तसंच राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवली आहे. मला खात्री आहे, त्यांच्या प्रक्रियेनुसार कारवाई होईल. या विषयाला राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. शिवरायांवर प्रेम करणारे लोक अशा प्रकारांमुळे नाराज झाले आहेत. राज्यपालांनी तोलून मापून बोलायला हवं. अशी विधानं वारंवार घडत आहेत. हे चालून जातं, याकडे दुर्लक्ष केलं जाईल, असं कोणाला वाटू नये. कोणत्याही महापुरुषांबाबतीत असं घडणं हे चांगलं लक्षण नाही.”