महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मिटणार…? अमित शहांनी दिलं आश्वासन, १४ डिसेंबरला काय होणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मागील काही दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता लवकरच मिटण्याची शक्यता आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दोन्ही राज्यांमधील सीमावाद सोडण्याबाबतचं आश्वासन दिलं आहे.
येत्या १४ डिसेंबरला अमित शहा हे यासंदर्भात दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. या चर्चेतून लवकर सीमावादावर तोडगा निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पेटला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर आपला दावा सांगितल्याने दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला करण्यात आला. तर कर्नाटकच्या काही वाहनांवर महाराष्ट्रात काळं फासण्यात आलं.
दरम्यान, या वादावर केंद्राने लवकरात लवकर तोडगा काढवा अशी मागणी, राज्यातील नेत्यांकडून केली जात आहे. आज महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत अमित शहा यांनी महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमावाद लवकरच सोडवू असं आश्वासन महाविकास आघाडीच्या खासदारांना दिलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे.
काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, “आज महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) जवळपास सर्वच खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतली. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात कर्नाटक सरकारकडून सातत्याने ज्या गोष्टी होत आहे. सीमाभागात मराठी बांधवांची जी गळचेपी होत आहे. याबाबत आम्ही चर्चा केली. अमित शहा यांनी येत्या १४ तारखेला दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी बोलावलं आहे. तसेच सीमावाद लवकरात लवकर सोडवला जाईल असं आश्वासन दिलं”.