महापरिनिर्वाण म्हणजे काय…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- यंदा मंगळवार 6 डिसेंबर 2022 रोजी 66 वा महापरिनिर्वाण दिन आहे.
भीम अनुयायींसाठी हा अतिशय खास दिवस आहे. गांजलेल्या दलितांसाठी बौद्धांसाठी जीवन वेचणार्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी दरवर्षी 6 डिसेंबर रोजी अलोट जनसागर उसळतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. या घटनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनाला महापरिनिर्वाण दिन या नावाने ओळखण्यास सुरुवात झाली. जाणून घेऊ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला महापरिनिर्वाण दिन या नावाने ओळखण्यामागचे कारण.
महापरिनिर्वाण म्हणजे काय…?
बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचं तत्त्व आणि ध्येय म्हणजे परिनिर्वाण. परिनिर्वाण म्हणजे मृत्यू नंतर निर्वाण. सोप्या शब्दात परिनिर्वाण म्हणजे मुक्ती.
आयुष्याचे कर्म मृत्यूनंतर आत्मा किंवा स्पिरीटच्या माध्यमातून पुढे जात राहते. निर्वाण स्थितीमध्ये पोहचल्यानंतर पुर्नजन्म नसतो, कारण आत्मा मुक्त होतो, असे बौद्ध धर्म सांगतो. जी व्यक्ती सात्त्विक, शुद्ध आयुष्य जगते ती निर्वाण स्थितीत पोहोचू शकते, असेही बौद्ध धर्म सांगतो. बौद्ध धर्मियांनुसार गौतम बुद्ध यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले ते मूळ महापरिनिर्वाण आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्लीतील त्यांच्या घरी 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. बौद्ध धर्माचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नागपुरात 14 ऑक्टोबर 1956 साली सुमारे 5 लाख अनुयायांनी त्यांना बौद्ध नेते म्हणून स्वीकारले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर अंत्यविधी मुंबईतील दादर चौपाटीवर करण्यात आले. यावेळेस बौद्ध धर्माप्रमाणे त्यांच्यावर संस्कार करण्यात आले. त्यांनी देशातून अस्पृश्यता निर्मूलनाचे काम केल्याने त्यांना बुद्धिस्ट गुरू म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलेली जागा चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते. बौद्ध धर्मीय आणि भीम अनुयायींसाठी ही जागा पवित्र आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे समाजाची प्रगती झाली. ज्यांना इतरांनी नाकारले किंवा वाईट वागणूक दिली अशा अनेकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगण्याची आणि शिक्षण घेऊन प्रगती करण्याची संधी मिळवून दिली. हे एक मोठे कार्य आहे. या कार्यामुळेच बाबासाहेबांच्या स्मृतीदिनाला महापरिनिर्वाण दिन या नावाने ओळखण्यास सुरुवात झाली.
भारतात दरवर्षी 6 डिसेंबर हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन अर्थात महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो.