राज्यपालांमुळे शिंदे गट त्रस्त…? राज्यपालांच्या जाण्याबाबत शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने आपल्या सरकारच्या कामाचं कौतुक करतात. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे पुण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबतीला शिंदे गटातील बडे नेते भरत गोगावले देखील होते.
यावेळी गोगावले यांनी राज्यपालांबाबत सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मागील काही दिवसांपासून सातत्याने शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहे. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाने राज्यात मोठा गदारोळ झाला. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार बॅकफूटवर गेलं आहे. विरोधकांकडून सातत्याने राज्यपाल कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात येत आहे. त्यातच भरत गोगावले यांनी राज्यपालांबाबत महत्त्वपूर्ण विधान करत सूचक इशारा दिला आहे.
भरत गोगावले म्हणाले की, राज्यपाल थोड्याच दिवसात जातील, त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. तसेच कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू देत, त्याने शिवाजी महाराजांचा अवमान करू नये. बोलताना तारतम्य बाळगल पाहिजे, असंही गोगावले म्हणाले.
दरम्यान श्रीकांत शिंदे म्हणाले की, २.५ वर्षात जे काम झाले नाही ते ५ महिन्यात या सरकारने केले आहे. विविध निर्णय या सरकारने घेतले. फक्त घोषणा नाही, त्याची अंबलबजावणी देखील सरकार करत आहे. २.५ वर्ष मुख्यमंत्री फक्त आपण असले पाहिजे, असं होतं. मात्र कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले गेले नाही, त्यामुळे उठाव झाला. यामुळे आज ५० आमदार आणि १३ खासदार आमच्या बरोबर आहेत, हा इतिहास आहे.