या नियुक्तीवरुन भाजप आणि शिंदे गटात मतभेद ; शिंदेंचाच हट्ट असल्याने आता पुढे काय होणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एका कारणावरुन ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा आहे. बिल्डर अजय आशर यांची नियुक्तीवरुन भाजप आणि शिंदे गटात वाद उद्भवल्याचे बोलले जाते.
आशर यांच्या नियुक्तीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच हट्ट आहे. त्यामुळे आता काय करावे, असा प्रश्न भाजपला पडला आहे.
केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर यांना बांधकाम क्षेत्र, सामाजिक, नागरी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे, असेच शासकीय परिपत्रकात म्हटले आहेत. मात्र मित्रच्या उपाध्यक्षपदी अजय आशर या बिल्डरची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने केली आहे. काँग्रेस, शिवसेना तथा महाविकास आघाडीने अजय आशर यांच्या नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्र पहिले राज्य
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे. अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर बांधकाम व्यावसायिक अजय अशर यांच्या नियुक्तीवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही सरकारवर हल्लोबल केला आहे. बिल्डरच्या हाती महाराष्ट्राच्या नियोजनाची जबाबदारी देणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आता आशर यांच्या नियुक्तीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. देशातील प्रादेशिक ‘मित्र’ संकल्पना राबवणारा पहिले राज्य म्हणून महाराष्ट्राचे नाव आघाडीवर आहे. नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर तज्ज्ञ, विविध प्रशासकीय विभागांचे सचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची सप्टेंबर २०२२ मध्ये बैठक झाली होती.
असे असेल मित्रचे कार्य
विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी भारत सरकारमार्फत नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यामध्येही अशा संस्थेची स्थापना करण्याबाबत आयोगाकडून सूचना प्राप्त झाली होती. ‘मित्र’ ला मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ व दैनंदिन कामकाजासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळ असेल. नियामक मंडळात उप मुख्यमंत्र्यांसह अध्यक्ष राहतील, तसेच उपाध्यक्ष पदी तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार उपाध्यक्ष म्हणून आशर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राच्या नीति आयोगाच्या धोरणाशी सुसंगत मात्र राज्याच्या गरजांची दखल घेत खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे राज्याचा जलद आणि सर्वसमावेशक विकास साधणे हा मित्रच्या स्थापनेचा हेतू आहे. मित्र राज्य शासनाचे विविध विभाग, भारत सरकार, नीति आयोग, सिव्हिल सोसायटी, विविध अशासकीय संस्था यांच्यात येत्या २५ वर्षापर्यंत राज्याचे निर्धारित उद्दीष्ट साध्य करण्याच्या हेतूने समन्वयाचे काम करेल, असे शासकीय परिपत्रकात म्हटले आहे.
दानवे यांचा कडक सवाल
महाविकास आघाडी सरकार काळात अजय आशर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजपाने आता अजय आशर यांची एवढ्या महत्त्वाच्या पदावर कशी नियुक्ती कशी होऊ दिली, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच दानवे यांनी तीव्र आक्षेप घेत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा एक व्हिडिओच शेअर केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात आशिष शेलार आणि मिहिर कोटेचा यांनी नगरविकास विभागाच्या कारभारात मंत्रालयाबाहेरील व्यक्ती असणाऱ्या अजय आशर यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप केला होता. अंबादास दानवे यांनी तोच व्हिडिओ ट्विट केला. नगरविकास विभागाचा कारभार चालवणारा आशर कोण? मंत्रालयात बसलेल्या अधिकाऱ्यांच्या ते वर आहेत का? विभागाचे निर्णय अजय आशर घेतात का, असे प्रश्न शेलार यांनी त्या व्हिडिओत केले होते. मात्र आता आशर यांना तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये धुऊन काढले की, तुम्हाला खोके दर्शन झाले, असा कडक सवाल दानवे यांनी केला आहे. आशर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यास भाजपचा विरोध होता, असे आता सांगण्यात येत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही नियुक्ती प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची मोठी अडचण झाल्याचे दिसत आहे.