छत्रपती शिवरायांचा आणखी किती अवमान सहन करायचा….? खासदार उदयनराजे यांचा सवाल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यपालांसह भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्ये केली जात असल्याने उद्विग्न झालेले खासदार उदयनराजे भोसले आज असंख्य मावळ्यांसह ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या मेळाव्यासाठी रायगडाकडे रवाना झाले.
”छत्रपती शिवरायांची अवहेलना केली जात आहे, त्यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. हे आणखी किती सहन करायचे? शिवरायांचा अवमान आपण कदापि सहन करणार नाही,” असे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.
राज्यपाल कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची तत्काळ हकालपट्टी केली जावी, अशी मागणी करून त्यासाठी त्यांनी 28 नोव्हेंबरची डेडलाइन दिली होती; परंतु भाजपकडून अद्यापि यासंबंधी काही हालचाली न झाल्याने उदयनराजे यांनी 3 डिसेंबर रोजी ‘निर्धार शिवसन्मानाचा’ याअंतर्गत रायगडावर एकत्र जमण्याची हाक तमाम शिवप्रेमींना दिली होती. त्यानुसार राज्यभरातून रायगडाकडे हजारो शिवप्रेमी रवाना झाले आहेत. खुद्द उदयनराजे आज असंख्य मावळ्यांसह रायगडाकडे रवाना झाले.
राज्यपालांनी केलेले वक्तव्य गंभीर!
छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या बेताल वक्तव्यांवरून खासदार उदयनराजे भोसले यांनी आज रायगडाला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केले. ”राज्यपालांनी केलेले वक्तव्य ही गंभीर बाब असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आपण सहन करणार नाही. रायगडावर शिवरायांच्या समाधीजवळ जाऊन आम्ही आमच्या वेदना मांडणार आहोत. त्यानंतर पुढचे काय करायचे ते एक-दोन दिवसांत ठरवू. यासंदर्भात आपल्याशी कोणीही बोललेले नाही. त्यांना जे योग्य वाटेल ते ते करतील आणि मला जे योग्य वाटेल, ते मी करीन,” असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. ”ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल, तेच शिवाजी महाराजांशी कोणाची तुलना करीत असतील,” असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.
राज्यपालांविरोधात आज उदयनराजेंचे रायगडावर आक्रोश आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सर्वत्र आंदोलने सुरू असून राज्यपालाविरोधात उद्या शनिवारी सकाळी खासदार उदयन राजे भोसले s रायगड किल्ल्यावर आक्रोश आंदोलन करणार आहेत. त्यासाठी राज्यभरातून हजारो शिवभक्त किल्ल्यावर दाखल झाले आहेत. हिंदवी स्वराज्याच्या राजधानीतून उदयनराजे कोणता एल्गार करणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.