हातपाय मारत सत्तेवर बसलेलं सरकार 40 गदारांच्या मागण्या पूर्ण करण्यातच वेळ घालवत आहे, आदित्य ठाकरेंचा घणाघात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे. प्रकल्प राज्याबाहेर चालले आहेत. राज्यातील शेतकरी त्रस्त आहेत. अशावेळी गेल्या 3 ते 4 महिन्यांमध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे दिसलेच नाहीत.
हे केवळ घोषणा सरकार झाले आहे. आता सगळ्या आमदारांना एकत्र ठेवायचं म्हणून ते फिरत आहेत. आता मिंधे गटाचे आमदार गुवाहाटीवरून गोवा आणि सुरत येथे जाणार का? आपल्या सर्वांना पहिल्या दिवसापासूनच माहित होतं की त्यांना त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात रस होता. राज्याला पुढे न्यायचं राज्याचं भलं करायचं हे कधीही त्यांच्या मनात नव्हतं ते आज दिसून येत आहे. हे सरकार हातपाय मारत सत्तेवर बसलं आहे. एकदा सत्तेत बसल्यानंतर लोकांची कामं कारण गरजेचं असतं मात्र 40 गदारांच्या मागण्या पूर्ण करण्यातच सगळा वेळ गेला आहे. लोकांकडे या सरकारचं लक्ष नाही. असा घणाघात युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे गटावर केला आहे.
ज्यांच्या माथ्यावर गद्दारीचा शिक्का आहे. त्यांच्यावर न बोलता आम्ही जनतेची कामे करत राहू. मंत्रीमंडळाचा विस्तार होणार म्हणता म्हणता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आता डिसेंबर देखील निघून जाईल. हे सरकार पडल्यावर देखील ते विस्ताराची चर्चा सुरु ठेवतील. असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
यावेळी राज्यपालांच्या वक्तव्याविषयी ते म्हणाले की, एवढे राजकीय राज्यपाल मी आत्तापर्यंत पहिले नाहीत. त्यांनी आम्हाला सत्तेतून बाहेर काढून टाकलं, 12 आमदार निवडून दिले नाहीत. आणि आता ते शिवाजी महाराज व महात्मा फुले यांचा अपमान करत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी अनेक लोकं पुढाकार घेऊन वक्तव्य करत आहेत. जर राज्य आणि केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेषी नसेल तर ते राज्यपाल बदलतील.
ओला दुष्काळ जाहीर करा ही आमची मागणी आहे. सध्या शेतकऱ्यांचे हाल बघण्यासारखे नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसोबत उभं राहणं हे सरकारचं कर्तव्य होतं. मात्र स्वतःच्या महत्वकांक्षा पूर्ण करण्यात हे सरकार मग्न असल्याने ते शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाहीत. ओला दुष्काळ जाहीर करून थोडीफार मदत शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती देखील पूर्ण झाली नाही. असे ते म्हणाले
राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावरून लक्ष विचलित करण्याकरिता कर्नाटकचे मुख्यमंत्री वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. मात्र हे आता राज्यात चालणार नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रप्रेमी जनतेने याविरोधात एकत्र येऊन या प्रकरणावर निकाल द्यायला हवा. खोके सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही मुंबईचा एकही आमदार नाही. मग यातून नेमका संदेश काय देताय? मुख्यमंत्री जिथे जातात तिथे स्वतःसाठी मागतात त्यांनी कधीतरी महाराष्ट्रासाठी मागावं. स्वतःसाठी काय ओरबाडत येईल हेच त्यांच्या मनात असतं अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.
यावेळी रामदेवबाबांच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी ते म्हणाले की, रामदेव बाबांकडून अशाप्रकारचं वक्तव्य येणं अपेक्षित नव्हतं. आपण महिलांकडे कसे बघतो हा दृष्टीकोन महत्वाचा आहे.