कट्टर हिंदुत्वामुळे सत्तारांनी कामाख्या देवीचं दर्शन टाळलं ; अंबादास दानवेंचा खोचक टोला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाचे आमदार आज कुटुंबासह गुवाहाटीमध्ये कामाख्या मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत.
दरम्यान याचवेळी शिंदे गटाचे आमदार तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मात्र गुवाहाटीला जाण्याचे टाळले आहे. तर यावरूनच ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सत्तार यांच्यावर निशाना साधत खोचक टोला लगावला आहे. कट्टर हिंदुत्वामुळे सत्तारांनी कामाख्या देवीचं दर्शन टाळलं असावे असा टोला अंबादास दानवेंनी लगावला आहे.
दानवे म्हणाले की, शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख यापूर्वी संजय राऊत यांनी रेडे म्हणून केला होता. त्यामुळे राऊत यांनी जे वक्तव्य केले होते त्यावरचं आम्ही ठाम आहोत. तसेच काही आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना दानवे म्हणाले की, अब्दुल सत्तार कडवट हिंदुत्ववादी असल्याने कामाख्या देवीच्या दर्शनाला जात नाहीत. त्यांचे काही वैयक्तिक कारणे असतील त्यात मी राजकीय जाणार नाही. पण जावे किंवा नाही जावे हे गद्दार लोकं आहे. त्यामुळे ते गेले काय आणि नाही गेले तरीही शिवसेनेला याने काहीही फरक पडणार नाही, असे दानवे म्हणाले.
भवितव्याविषयी साशंकता…
यावेळी बोलतांना दानवे म्हणाले की, कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणे ज्याचात्याच्या आस्थेचा प्रश्न आहे. मात्र आत्ताच्या परिस्थितीत जनतेच्या प्रश्नाला वेळ देण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही आणि देवदर्शनासाठी वेळ आहे, ज्योतिषाकडे हात दाखवण्यासाठी वेळ आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्या मनात आपल्या भवितव्याविषयी साशंकता निर्माण केल्यावर माणूस अशाप्रकारे ज्योतिष, देवधर्माचा आसरा घेत असतो. त्यामुळे तसाच काही हा प्रयत्न दिसतोय. कामाख्या देवीचं नवस फेडण्यासाठी गेले म्हणता, मग जे लोकं गेले नाहीत त्यांना काही मिळाले नाहीत का? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांसाठी कुणाकडेही वेळ नाही…
पक्ष उभारणी करण्याची शिवसेनेला गरज नसून, शिवसेनेचं संघटनचं जे शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केले आहे ते कधीच तुटत नसते. एखांदा माणूस गेला म्हणून संघटन तुटले हे कदापि शिवसेनेत झालं नाही आणि कदापि होणार सुद्धा नाही. दरम्यान राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला असून, त्याला अजूनही मदत पोहचलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात वाढल्या असून, त्याकडे लक्ष देण्यासाठी कुणालाही वेळ नाही. अशावेळी या शेतकऱ्यांच्या व्यथा आजच्या शेतकरी मेळाव्यातून उद्धव ठाकरे मांडणार असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.