पवार कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सांगली :- राज्यात शरद पवारांनी अनेक घरे फोडून आपले राजकारण केले. त्यामुळे त्यांनी जे पेरले तेच उगवते. त्यामुळे शरद पवारांचे घर फुटीच्या उंबरठयावर असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केला.
अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची सूज आली होती. सत्ता गेल्यानंतर त्यांची सूज उतरली आहे. आता त्यांच्या पोटात दुखत आहे, असा टोला पडळकर यांनी लगावला. ते सांगलीमध्ये बोलत होते.
भाजप विचाराने प्रेरित होऊन काम करते, म्हणून आमचा एकही आमदार फुटणार नाही. पवारांच्या घरात उभी फूट पडते का काय, असे वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे. तुम्ही राज्यातली एवढी घरे फोडली, एवढ्या लोकांना फोडले, त्यामुळे तुम्ही जे केले, तुम्ही जे पेरले, ते उगवणार आहे. हा भाजपचा आणि भाजपच्या विचारांचा विजय आहे,’ असे पडळकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची सांगली जिल्ह्यातील संघटनेची परिस्थिती वाईट आहे. सांगली हा राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा जिल्हा असून, ते स्वत:च निवडून येऊ शकतात. तासगावमध्ये सुमन पाटील आणि शिराळ्यात मानसिंगराव नाईक हे त्यांच्या हिंमतीवर निवडून येतात. जयंत पाटील यांच्या पाठीमागे फक्त प्राजक्त तनपुरे आहे, बाकी कोण नाही, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.
दरम्यान पडळकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांच्या घरात फूट पडली आहे, ती मोजण्यासाठी पडळकर फुटपट्टी घेऊन गेले होते का, माहिती नाही, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. दुसरीकडे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मात्र पडळकर यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. गोपिचंद पडळकर यांचं वक्तव्य कार्यकर्त्यांच्या प्रोत्साहनासाठी होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.