काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला तीन दिवसांचा ब्रेक ; ‘हे’ आहे कारण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मागील काही दिवसांपासून सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडी यात्रा तीन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबरपासून तामिळनाडूतील कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सुरू झालेली भारत जोडी यात्रा दिवाळीच्या मुहूर्तावर तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात येणार आहे.
काँग्रेसच्या संपर्क विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
सध्या देशभरात दिवाळी साजरी होत आहे. यानिमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या ‘भारत जोडो यात्रे’ला दिवाळीमुळे ब्रेक लागल्याची बातमी समोर आली आहे. दिवाळीनिमित्त बहुतांश लोक आपापल्या घरी सण साजरा करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ तीन दिवस पुढे ढकलण्यात येणार आहे. तर 27 ऑक्टोबरला सकाळी पुन्हा तेलंगणातून प्रवास सुरू होईल.
काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले की, ‘भारत जोडो यात्रा’ दिवाळीमुळे तीन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे . दिवाळी सणानिमित्त 24 आणि 25 ऑक्टोबरला एकही यात्रा होणार नाही, तर 26 ऑक्टोबरला काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे औपचारिकपणे पदभार स्वीकारणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यानिमित्ताने काँग्रेस मुख्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यात राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे 26 ऑक्टोबरची यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 27 ऑक्टोबर रोजी सर्व पदयात्री पुन्हा भारत जोडो यात्रेत सामील होतील.