दिवाळीच्या दिवशी विषाची बाटली हातात घेऊन शेकडो शेतकरी रस्त्यावर, काय आहे प्रकरण…..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलढाणा :- येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी राज्य सरकारकडे सातत्याने केली जात आहे. पण सरकारचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
बुलडाण्यातही शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दुष्काळग्रस्त भागाची नुकसान भरपाई न मिळाल्याने दिवाळीच्याच (Diwali festival) दिवशी शेकडो शेतकरी अर्धनग्न अवस्थेत विषाची बाटली हातात घेवून रस्त्यावर उतरले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भातील अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,ओला दुष्काळ जाहीर करून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये (compensation) नुकसान भरपाई द्या. ही मागणी करत दिवाळीच्या दिवशी सकाळी पहाटेपासून अर्धनग्न अवस्थेत विषाची बाटली हातात घेऊन शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येला शिंदे-फडणवीस सरकारच जबाबदार आहे,असा आरोप प्रशांत डिक्कर यांनी सरकारवर केला आहे.
पिकांचे नुकसान होऊनही सरकारने अतिवृष्टीची मदत दिली नसल्याने संतप्त शेतकरी आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत.सरकारने खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना मदतीपासून वंचीत ठेवलं आहे.शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय केल्याने शेतकऱ्यांवर विष पिण्याची वेळ आली असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहेत.ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांना विना अट १०० टक्के नुकसान भरपाई द्या, अशी मागणी यावेळी प्रशांत डिक्कर यांनी सरकारकडे केली आहे.