राष्ट्रपतीपदाची निवडणूक नितीश कुमार लढवणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पटना :- या वर्षी जुलै-ऑगस्ट मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार….?
प्रशांत किशोर यांना भेटण्यामागं नितीश कुमारांची काय असेल रणनीती? असे बरेच प्रश्न यानिमित्तानं राजकीय वर्तुळात उपस्थित केले जाताहेत. याचं कारणही तसंच आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) हे अनेक पक्षांच्या प्रमुखांशी भेटी-गाठी घेताना दिसत आहेत. तर नितीश कुमार यांना इतर पक्षांशी संपर्क साधण्यासाठी प्रशांत किशोर यांना माध्यम बनवण्यात आल्याचं बोललं जातंय.
या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (Presidential Election 2022) होणार आहेत. यादरम्यान, भाजपच्या विरोधात जोरदार आवाज उठवणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी अनेक पक्षांच्या प्रमुखांशी भेटण्याचं सत्र सुरु केलंय. बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस पक्षांना (Congress Party) एकत्र करण्यासाठी केसीआर यांनी पुढाकार घेतलाय. नुकतीच त्यांनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची भेट घेतलीय.
या महिन्यात प्रशांत किशोर आणि केसीआर यांच्यात बैठक झाली होती. यानंतर प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. यापूर्वी तेजस्वी यादव यांनी केसीआरशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. या सर्व बैठकांचा अजेंडा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतून भाजपला (BJP) धक्का देण्याचा डाव असल्याचं मानलं जातंय. केसीआर हे काँग्रेस वगळता टीएमसी, सपा, आप, आरजेडी, जेडीयू या सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. केसीआर यांना नितीश कुमार हे अत्यंत तगडे उमेदवार असतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळं काँग्रेसलाही नितीशना पाठिंबा देणं भाग पडू शकतं, असं काही जाणकारांचं मत आहे.
..तर बिहारचंही राजकारण बदलणार
विरोधी पक्षाकडून नितीश कुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवण्यापूर्वी भाजपकडून नितीश यांना उपराष्ट्रपती बनवण्याची तयारी सुरु होती. मात्र, आता नवी समीकरणं समोर आल्यानंतर बिहारच्या राजकारणात भूकंप होऊ शकतो. नितीश यांनी विरोधकांचा प्रस्ताव मान्य केल्यास, त्यांची भाजपपासून फारकत निश्चित मानली जात आहे. अशा परिस्थितीत राजद आणि जेडीयू एकत्र आल्यास भाजपला सत्तेतून बाहेर पडावं लागेल.