आ.नितेश राणेंसोबत निलेश राणे ही आता आले अडचणीत ; सिंधुदुर्गात गुन्हा दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजप आमदार नितेश राणेंपाठोपाठ आता निलेश राणेंच्याही अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर न्यायालय परिसरात पोलिसांनी नितेश राणेंची गाडी थांबवली. त्यानंतर निलेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. त्यामुळेच निलेश राणेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत वैभव नाईक यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे.
पत्रात काय म्हटलं? –
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदी असताना देखील निलेश राणे यांनी जिल्हा न्यायालयाबाहेर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच पोलिसांसोबत अरेरावी केली. शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल निलेश राणेंसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असं वैभव नाईक यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं? –
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं नितेश राणेंचा जामीन फेटाळला. तसेच संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांनी आधीच फिल्डींग लावली होती. न्यायालयानं जामीन फेटाळताच पोलिसांनी राणेंच्या गाडीला घेराव घातला. पण, तुम्हाला गाडी थांबवण्याचे आदेश कोणी दिले, असा सवाल करत निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले होते. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहात. आधी आदेश दाखवा आणि गाडी थांबवा, असं निलेश राणे म्हणाले होते.