आ.नितेश राणेना मोठा झटका ; मुंबई हायकोर्टनेही अटकपूर्व जामीन फेटाळला…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला. जवळपास दोन आठवड्यांच्या अज्ञातवासानंतर दोनच दिवसांपूर्वी नितेश राणे माध्यमांसमोर आले होते. त्यानंतर आता कोर्टाने त्यांना धक्का दिला आहे. नितेश राणे हे संतोष परब यांच्यावरील हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचा आणि हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारत त्यांना मोठा झटका दिला आहे. साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा, अशा अटी नितेश राणेंना घालण्यात आल्या आहेत.
मारहाणीचा आरोप
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारावेळी नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. त्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर, नितेश राणेंनी हायकोर्टात धाव घेतली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली, त्याच्या स्वागताच्या निमित्ताने नितेश राणे माध्यमांसमोर आले होते.
नारायण राणेंच्या वक्तव्याने वाद
काही दिवसांपूर्वीच कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजवल्याने राज्यातले राजकारण तापले होते, नितेश राणे यांचा पोलीस शोध घेत होते, त्यावेळी नारायण राणे यांची पत्रकार परिषद सुरू असता नितेश राणे कुठे आहेत? असे विचारल्यावर, सांगायला मुर्ख आहे का? असे उत्तर दिल्याने बराच वाद पेटला होता.
नितेश राणे-शिवसेना वादाचा ताजा घटनाक्रम
23 नोव्हेंबर 2021 रोजी विधानसभा अधिवेशनात म्याव म्यावचा प्रकार घडला
नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्याव म्याव केलं
18 डिसेंबर 2021 रोजी शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब याला मारहाण
मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांनी मारहाण केल्यावर नितेश राणे यांचं नाव घेतलं
27 डिसेंबर 2021 रोजी मारहाण प्रकरणात नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला
नितेश राणे यांनी तात्काळ अटकपूर्व जामीनासाठी सिंधुदुर्ग सेशन कोर्टात धाव घेतली
त्यावर 31 डिसेंबर 2021 रोजी कोर्टाने निकाल देत नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
नितेश राणे यांच्या वतीने 3 जानेवारी रोजी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला
अर्जावर त्याच दिवशी सुनावणी झाली
यावेळी राज्य सरकार तर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागण्यात आले
तसंच पुढच्या सुनावणीपर्यंत अटक न करण्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं. पुढील सुनावणी 7 जानेवारी रोजी ठेवण्यात आली.
7 जानेवारी रोजी राज्य सरकारतर्फे नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करणार आरोपपत्र दाखल करण्यात आलं. यावेळी राणे यांच्या वतीने त्यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागण्यात आला.
कोर्टाने 12 जानेवारीपर्यंत वेळ दिला. तोपर्यंत अटक न करण्याची सुरक्षा राणे यांना कायम होती.
12 जानेवारी रोजी वेळेअभावी सुनावणी पूर्ण झाली नाही
13 तारखेपर्यंत नितेश राणे यांना अटकेपासून दिलासा कायम होता
13 जानेवारी रोजी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. यावेळी कोर्टाने आपला निकाल राखून ठेवून हा निकाल आज 17 जानेवारीला देण्याच जाहीर केलं.
17 जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला