शिक्षक अनेक बालकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतात :- देवेंद्र राजुरकर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :- यवतमाळ जिल्ह्यात बालकावरील लैगिक तथा इतर अत्याचारांच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शिक्षकांनी सावधगिरी बाळगून बालकावर होत असलेल्या अत्याचाराची प्रकरणे उघडकीस आणल्यास ह्या बालकांचे भावी आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून ते वाचवू शकतात. असे प्रतिपादन श्री देवेंद्र राजूरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले. ते आरंभी व तुपटाकळी केंद्रातील सुमारे 125 शिक्षक तथा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या करिता आयोजित कार्यशाळेत बोलत होते. पोक्सो कायदा व शिक्षकांची भूमिका या विषयावर देवेंद्र राजूरकर यांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने सत्र घेतले. जिल्ह्यात यापूर्वी घडलेल्या पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांच्या विविध घटना सांगून या विषयाची दाहकता प्रतिपादीत केली.पोक्सो कायद्याची माहीती दिली.गुड टच-बॕड टच तथा या विषया वरील इतर व्हिडीयो सर्वांना उपलब्ध करुन दिलेत. विद्यार्थी तथा त्यांच्या पालकांना सदर व्हिडिओ दाखवणे बाबत त्यांनी सूचना केली. बालकाच्या बदलल्या वर्तनावरून त्याच्याशी जिव्हाळ्याने आणि प्रेमाने हितगुज करून सदर बालकाला बोलके करून पुढील अनर्थ शिक्षकांना टाळता येईल. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये बालकांच्या अगदी जवळचे नातेवाईक किंवा परिचित व्यक्तीच गुन्हेगार आढळून आले आहेत. त्यामुळे सदर बालकावर प्रचंड मानसिक दडपण असते. अशा प्रकारची माहिती राजूरकर साहेबांनी दिली. सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नंदकिशोर लडके हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच श्री रविकांत निकम, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री हनुमंतराव निकम, भगवान सुरदुसे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.प्रास्तविक केंद्रप्रमुख किरण बारशे यांनी तर बहारदार संचलन श्री आमिन चौहान यांनी केले .आभार मुख्याध्यापक श्री गजानन तुंडलवार यांनी मानलेत.