मोठी बातमी : महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून आणखी कडक निर्बंध ; कोरोनाचा धोका वाढला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रचंड वाढलीय.. त्यात ओमायक्राॅनचे संकट आले.. ओमायक्रॉन व कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली.
त्यानंतर राज्यात नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या नियमावलीनुसार राज्यात 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या देशात सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 82,000 वर गेली आहे. त्यात गेल्या 24 तासांत देशात 10 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्या अनुषंगाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. त्यानंतर, राज्य सरकारच्या आपत्ती विभागाने गुरुवारी (ता. 30) परिपत्रक जारी करत राज्यातील निर्बंध आणखी कडक केले आहेत. हे निर्बंध आज (ता. 31) मध्यरात्रीपासूनच लागू होणार आहेत.
काय आहेत नवे निर्बंध?
बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी.
सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी, मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांनाच उपस्थितीची परवानगी.
अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी.
पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू.
परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा
यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.
गर्दी टाळा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, की “नववर्षाचा शुभेच्छा..! मात्र, 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या स्वागतसाठी गर्दी करु नका. कोरोना संसर्ग वाढेल, असे कुठलेही कार्य करू नका. कोरोना नियमांचे पालन करा. नवीन वर्ष कोरोनामुक्तीचे वर्ष ठरेल, अशी आशा..!”