“खुज्या राज्यकर्त्यांना कोण सांगणार…?” इंदिरा गांधीच्या मुद्द्यावरून सेनेची मोदी वर टीका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दोन दिवसांपूर्वी बांगलादेश युद्धात भारताच्या विजयाच्या स्मृतीनिमित्य देशात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव घेतलं नाही.
त्यावरून प्रियांका गांधी यांनी सरकारवर टीका केली होती. तसेच विरोधकांनी देखील मोदी सरकारचा समाचार घेतला. आता शिवसेनेने सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली आहे.
”इंदिरा गांधीं यांना वगळून जगाचा इतिहास कोणालाच लिहिता येणार नाही” –
”1971 साली बांगलादेशचे युद्ध हिंदूस्थानने जिंकले त्यास ५० वर्ष झाली. ५० व्या विजय दिनानिमित्त शूर जवानांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. त्या विजय दिवशी झालेल्या कार्यक्रमात पराक्रमी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नाव घेण्याचे सौजन्यही नरेंद्र मोदी यांनी दाखवले नाही. इंदिरा गांधींनी धाडस दाखवले नसते तर पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवताच आली नसती. इंदिरा गांधी यांना वगळून देशाचा नव्हे, तर जगाचा इतिहास कोणालाच लिहिता येणार नाही. पण, आपल्या देशातील खुज्या राज्यकर्त्यांना हे कोण सांगणार?”, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींवर कऱण्यात आला आहे.
”दिल्लीतील राज्यकर्ते गोधडीत रांगत असतील” –
”इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि १९४७ च्या फाळणीचा बदला घेतला. इंदिरा गांधी या जगातील शक्तीमान नेत्या म्हणून जगासमोर आल्या. हिंदूस्थानकडे वाकड्या नजरेनं पाहाल, तर पाकिस्तानचे केले तसे तुकडे करू, असा संदेश इंदिरा गांधींनी जगाला दिला. त्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना सध्याच्या राज्यकर्त्यांनी इंदिरा गांधींचं साधं नावही घेऊ नये? त्यांचं नाव घ्यायला भय वाटतं की लाज वाटते? इंदिरा गांधींनी १९७१ चा पराक्रम केला, तेव्हा आजचे दिल्लीतले राज्यकर्ते कदाचित गोधडीत रांगत असतील” अशी बोचरी टीका पंतप्रधान मोदींवर केली आहे.