महाविकास आघाडीत आमचं १०० टक्के नुकसान ; शिवसेना खासदाराची खदखद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडी हे तीन पक्षांचं सरकार असून या सरकारमध्ये आलबेल नाही, अशी टीका वारंवार केली जाते. आता पुन्हा या सरकारमधील खदखद समोर आली आहे.
महाविकास आघाडीमध्ये आमचं शंभर टक्के नुकसान होत आहे. इथं मोठ्या प्रमाणावर आमचा वापर केला जातोय, अशी खंत शिवसेनेच्या खासदारानं व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचा समावेश आहे. मात्र, या तिन्ही पक्षातील नेते कधी कधी टोकाची भूमिका घेताना दिसतात. यापूर्वीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकत्र जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आता परत हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी देखील खदखद बोलून दाखवली आहे. ”महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचं शंभर टक्के नुकसान होत आहे. आमचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातोय. या बाबी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत. केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश आहेत म्हणून आम्ही सर्व सहन करतोय. हे जाहीरपणे बोलण्याची गोष्ट नाही. पण, मी खरा शिवसैनिका आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शब्दाला मान देतो”, असं हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील म्हणाले
अशोक चव्हाणांना लगावला टोला –
काही दिवसांपूर्वी मंत्री अशोक चव्हाण यांनी आम्ही आहोत म्हणून सरकार आणि सत्ता आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरूनच आता हेमंत पाटलांनी चव्हाणांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठं असता? असा सवाल त्यांनी अशोक चव्हाणांना केला आहे. आम्ही आहोत म्हणून सरकार आहे, अशा गर्वात कोणी राहू नये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय संयमानं यांच्या सर्व अटी-शर्ती मान्य करून सरकार चालवत आहेत. शिवसेनेचे मुख्यमंत्री नसते तर ते कुठे असते. ही एकत्र आघाडीची ताकद आहे. थोडंस इकडं तिकडं झालं तर घरी बसायची वेळ सर्वांवर येईल, असा इशाराही हेमंत पाटलांनी दिला.