राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांचे विज बिल कोरे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कृषिपंप वीजजोडणी धोरणाचा लाभ राज्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यांचे वर्षानुवर्षे थकबाकी असलेले कृषिपंपांचे वीजबिल आता कोरे झाले आहे. या शेतकऱ्यांचे तब्बल १५ हजार ९६ कोटी ६६ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.
आता चालू वीजबिल आणि मार्च- २०२२ पर्यंत सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास राज्यातील ४४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना तब्बल १५ हजार ३५३ कोटी ८८ लाख रुपयांची आणखी माफी मिळणार आहे. बिल भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
कृषिपंप वीजजोडणी धोरणातून बिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. राज्यातील ४४ लाख ५० हजार ८२८ शेतकऱ्यांकडे सप्टेंबर २०२० पर्यंत ४५ हजार ८०४ कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यात ‘महावितरण’ने निर्लेखित केलेले १० हजार ४२० कोटी ६५ लाख आणि विलंब आकार व व्याजामधून चार हजार ६७६ कोटी एक लाख रुपयांची सूट अशी एकूण १५ हजार ९६ कोटी ६६ लाखांची रक्कम माफ करण्यात आली आहे. सोबतच वीजबिलांच्या दुरुस्तीमधून २६६ कोटी ६७ लाख रुपयांची रक्कम समायोजित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे आता ३० हजार ४४१ कोटी ७५ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी चालू वीजबिल तसेच येत्या मार्च- २०२२ पर्यंत थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे १५ हजार ३५३ कोटी ८८ लाख रुपये माफ होणार आहेत.
‘महावितरण’चे आवाहन
वीजग्राहकांकडे बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महावितरणला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या चालू वीजबिलांची रक्कम भरणे आवश्यक आहे. योजनेत सहभाग नाही तसेच चालू वीजबिलांचा भरणाही नाही, अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा नाइलाजाने खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे व सोबतच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे
राज्यातील थकबाकी
शेतकरी – ४४ लाख ५० हजार ८२८
सप्टेंबर २०२० पर्यंत थकबाकी – ४५ हजार ८०४ कोटी
रक्कम माफ – १५ हजार ९६ कोटी ६६ लाख