अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव ; पटोलेंनी राजीनामा द्यावा :- बावनकुळे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- विधानपरिषदेत खऱ्या अर्थाने नाना पटोलेंचा पराभव आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं बावनकुळे म्हणाले.
विधानपरिषद निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये ऐनवेळी काँग्रेसवर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची नामुष्की ओढावली होती. यामुळे भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय निश्चित मानला जात होता. बावनकुळे यांनीही अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला 180 मते मिळाली. काँग्रेसमध्ये नाना पटोले यांची हुकुमशाहीचे हे परिणाम आहे. काँग्रेसचे नेते हुकुमशाही करत होते म्हणून त्यांचा पराभव झाला. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याच्या लायकीचे नाहीत अशा शब्दात बावनकुळेंनी टीका केली. भाजपने स्वत:ची मते एकत्र ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न घोडेबाजार नाहीत. आमच्याकडे घोडेबाजार झाला नाही तर काँँग्रेसकडे झाला असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
छोटू भोयरच्या मदतीने खिंडार पाडू अशी काँग्रेसला अपेक्षा होती. पण छोटू भोयरचा अपमान केला. शेवटच्या दिवशी त्या उमेदवाराला बदललं हे दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिलीच अशी घटना आहे. काँग्रेसचा छोटा कार्यकर्तासुद्धा यामध्ये नाराज आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार बावनकुळे यांनी मानले. काँग्रेसमध्ये अफरातफरी झाली. हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवण्याच्या परिणामाचे हे उदाहरण आहे. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे दोन मंत्र्यांच्या दबावात आले आणि त्यांनी उमेदवार बदलला. हे उमेदवार व मतदारांना जनतेला मान्य नव्हते. काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे आणि याचा फटका बसला असेही बावनकुळे यांनी म्हटलं.
महाराष्ट्रामध्ये संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आणि यानंतर सर्व निवडणुका होतील त्यात भारतीय जनता पार्टी विजय मिळवेल असंही बावनकुळे म्हणाले. तसंच नाना पटोले हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवत आहेत. विधानपरिषदेत खऱ्या अर्थाने नाना पटोलेंचा पराभव आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे असं बावनकुळे म्हणाले.
नागपूरमध्ये विधानपरिषद निवडणुकीत ५५४ पैकी बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली. बावनकुळेंनी या निवडणुकीत १७६ मतांनी विजय मिळवला. मंगेश देशमुख यांना १८६ मते तर काँग्रेसच्या तिकिटावर उभा राहिलेले रविंद्र भोयर यांना एकच मत मिळाले. महाविकास आघाडीकडे नागपुरात २०२ मते होते. मात्र त्यांची १६ मते फुटल्याचं निकालातून स्पष्ट दिसून आलं. यामुळे भाजपने घोडेबाजार केला असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.