पेपरफूटीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे :- भाजप आक्रमक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबईकडून विविध पदांच्या भरतीसाठी रविवारी आयोजित केलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आली. यावरून भाजपाने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
शिवाय, ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हाडा पेपर फुटीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं सांगितलं आहे. शिवया, परीक्षांमध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचंही ते म्हणाले आहेत.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “परीक्षा जाहीर करायच्या आणि त्यानंतर पेपरफुटीने त्या रद्द करायच्या, अशाप्रकारचा सातत्याने काळाकारभार चाललेला आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे देखील आरोग्य विभागाच्या परीक्षा तीन-तीन वेळा रद्द करून, पेपर फुटला आणि त्याची तारं मंत्रालयापर्यंत गेलेली आहेत. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार या परीक्षांमध्ये सुरू आहे. सामान्य युवकांची फरपट सुरू त्यांचा आक्रोश सुरू आहे. त्यामुळे सरकारने यावर कडक कारवाई केली पाहिजे. सरकारमध्ये कोण दोषी आहे? कुणावर तर दोषारोप झाला पाहिजे. कोणावर दोषारोप देखील होत नाही. मंत्री नामानिराळे मुख्यमंत्री नामानिराळे हे चालणार नाही. फार मोठा रोष या संदर्भात आहे, याची कडक कारवाई झाली पाहिजे. आमची तर मागणी आहे की या सगळ्या पेपरफुटीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.”
तसेच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त करत, राज्य सरकारला सवाल देखील केला आहे. “भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?” असं फडणवीस म्हणाले आहेत.
“आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत, आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय ! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका! दोषींवर कठोर कारवाई कराच!पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही?” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे