“पांढरे कपडे घालणाऱ्यांचे काळे कारनामे पाहिले”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
औरंगाबाद :- ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या कामाचा प्रारंभ रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाला.
या अनुषंगाने औरंगाबाद रेल्वेस्थानकावरील कार्यक्रमात राजकीय टोलेबाजीने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.
अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रशांत बंब, माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात खासदार इम्तियाज हे काळे कपडे परिधान करून आले होते.
त्यांच्या या पेहरावाची उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती. याचा खुलासा करताना खासदारांनी आपल्या भाषणात टोलेबाजी केली. काळ्या कपड्याबद्दल खुलासा करताना, मी निषेध व्यक्त करत नाही. मात्र, पांढरे शुभ्र कपडे घालणाऱ्यांचे काळे कारनामे पाहिल्याचे स्पष्ट करतानाच भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना उद्देशून काळ्या कपड्यावर आक्षेप घेऊ नका, असे सुनावले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकाचा योजनेत समावेश केल्याबद्दल आभार व्यक्त केले. ‘विमानतळाची इमारत अत्यंत आधुनिक आहे, पण विमाने नाहीत. त्यामुळे सध्यातरी ती केवळ एक वास्तू आहे. असे रेल्वेस्थानकाचे होऊ नये’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक राजेंद्रकुमार मीना यांनी केले. श्री. खंदारे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
संजय शिरसाट यांना मंत्री करा!
शहराला सहा मंत्री मिळाले आहेत. आणखी एक मंत्री रांगेत आहेत. माझी इच्छा आहे की, संजय शिरसाट यांनाही मंत्रिपद द्यावे. ते मंत्री झाले तर सात मंत्री होतील. यापेक्षा ‘अच्छे दिन’ काय असू शकतील?, असा खोचक टोला खासदार इम्तियाज यांनी लगावला. ‘डाॅ. भागवत कराड यांनी आपल्या भाषणात देशाच्या सर्व भागांत शहरातून विमानसेवा पोचवण्याची घोषणा करावी. मग आपण अभिनंदन करू. ते घोषणा मोठ्या करतात, प्रत्यक्षात काम काही होत नाही. रेल्वेस्थानकाच्या कामाचा हिशोब आम्ही सहा महिन्यांनी मागू, इमारत बांधून काही होणार नाही, कनेक्टिव्हिटी द्यावी’, अशी कोपरखळीही खासदारांनी मारली.
‘उडाण’मधून विमाने घेणार उड्डाण
खासदार इम्तियाज यांच्यानंतर डॉ. कराड यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, २४१ कोटी २७ लाख रुपयांचे रेल्वेस्टेशन होणार आहे. मनमाड ते नांदेड विद्युतीकरण झाले. आता केंद्रीय मंत्री दानवेंच्या प्रयत्नाने मनमाड ते संभाजीनगर ९९० कोटींचे टेंडर निघाले आहे. पीटलाईटचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. यापुढे वंदे भारत ट्रेन, हायस्पीड ट्रेनसाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली. तसेच खासदार इम्तियाज यांच्याकडे पाहत सांगितले, की ‘उडाण’ योजनेतून काही विमाने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मंत्री अतुल सावे यांनीही मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांच्या काळात ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांचा विकास होत असल्याचे स्पष्ट केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..