तलाठी दप्ताराची जिल्हाधिकाऱ्यांनी केली तपासणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 13 ऑक्टोबर :- कुठल्याही सबळ कारणाशिवाय फेरफार व जमीन विषयक कामे प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेवून सामान्य शेतकरी व नागरिक यांच्या जमीनी विषयक तक्रारी व प्रश्न तलाठी कार्यालयामार्फत तातडीने सोडविण्यात याव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज तलाठी कार्यालयास दिले.
महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज वणी व मारेगाव तालुक्यात भेट देवून तेथील तलाठी दप्तराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सात-बारा उतारे, विविध गाव नमुने, प्रलंबित फेरफार, सरकारी वतन व इनाम जमीनीची नोंद यासह अनेक बाबींची पाहणी केली. तसेच पीक पाहणी व संगणकीकरण या बाबींचीही छाननी केली.
जिल्हाधिकारी यांनी मंदर येथील निसर्ग पर्यटन केंद्र तसेच वन विभागाच्या अटल आनंदवन योजनेअंतर्गत वृक्ष लागवड प्रकल्पाची पाहणी केली. वणी नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पांतर्गत पाणी साचलेल्या ठिकाणी जमीन समतल करण्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसिलदार विवेक पांडे, महसूल, आरोग्य, कृषी, नगरपरिषद, वन व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.